धरणात गतवर्षीपेक्षा सुमारे 20 टक्के कमी पाणीसाठा
पिंपरी – गेल्या दोन-तीन दिवसात शहरामध्ये आणि सोबतच धरणक्षेत्रातही पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. एकीकडे पाणी कपात रद्द करण्याची मागणी होत असतानाच पावसाचा जोर ओसरला असून चिंता वाढल्या आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला असला तरी कोरडा गेलेला जून महिना आणि यावर्षी धरणाच्या पाण्याने गाठलेला तळ पाहता अधिक पावसाची अपेक्षा होता. जुलै महिना अर्धा संपला असून अद्याप धरण अर्धेही भरले नाही. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्के पाणी साठा कमी आहे. हे आकडे नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढविणारे आहेत. गेल्या वर्षी परतीचा पाऊस अपेक्षेनुसार न बरसल्याने यावर्षी धरणात नीचांकी पाणी साठा पहायला मिळाला. पाऊस सुरु होण्यापूर्वी धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा उरला होता. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत कमी पाणी साठा होता.
पावसाने खरा जोर जुलै महिन्यात धरला त्यात प्रामुख्याने 6 जुलै ते 12 जुलैच्या काळात रोज पडत असलेल्या पावसामुळे धरण सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत भरले होते. परंतु त्यानंतर हळू-हळू पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या वर्षीचा परतीच्या पावसाचा अनुभव पाहता आताच पाऊस पडून धरण भरावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अन्यथा पाणी कपात रद्द होणे तर अशक्यच आहे, उलट वाढण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत.
16 जुलै रोजी सकाळी नोंदविलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासांत सुमारे 12 मिमी इतका पाऊस पडला असून एक जूनपासून आतापर्यंत 1087 मिमी इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात 43.44 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशीपर्यंत सुमारे 1556 मिमी इतका पाऊस झाला होता आणि धरणात 63.16 टक्के इतका पाणी साठा होता. अर्थात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 469 मिमी पाऊस कमी पडला असून पाणीसाठा ही सुमारे 20 टक्क्यांनी कमी आहे. 12 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरला असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा कमी दिसत आहे.
6 ते 12 जुलै दरम्यान झालेल्या पावसाने धरणसाठ्यात वाढ करण्यात मोठे योगदार दिले आहे. या दरम्यान सर्वाधिक पाऊस 7 जुलै रोजी 120 मिमी आणि 11 जुलै रोजी 115 मिमी इतका झाला. तर याच कालावधीत सर्वांत कमी पाऊस 10 जुलै रोजी झाला होता. तो देखील 36 मिमी इतका होता. 12 जुलैनंतर मात्र पावसाचा जोर खूपच कमी झाल्याचे दिसत आहे.