दुबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पाचऐवजी सहा दिवसांचा खेळवण्याचा नवा प्रयोग करणार असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत.
अपुरा प्रकाश, पाऊस तसेच काही कारणांमुळे पाच दिवस खेळूनही सामना अनिर्णित राहिल्यास सहाव्या दिवशी सामन्याचा विजेता ठरावा यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, यासाठी भारत व न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मत मागवण्यात आले आहे. साऊदम्पटन येथे 18 ते 22 जूनदरम्यान या दोन संघांत ही निर्णायक कसोटी खेळवण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी आयसीसीची बैठक होणार असून या बैठकीदरम्यान या सामन्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल.
कसोटी सामन्याच्या पाच दिवसांत पाऊस, अपुरा प्रकाश तसेच अन्य काही कारणांमुळे खेळ होऊ शकला नाही, तर सहाव्या दिवसापर्यंत सामना सुरू ठेवण्याचा निर्णय आयसीसी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होत असल्यामुळे अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांना विजेतेपद विभागून द्यायचे की सहाव्या दिवशी खेळ व्हावा, याविषयीही या बैठकीत मत घेतले जाणार आहे.