मुंबई – भारत आणि न्यूझीलंड संघात पुढील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी तयारी करताना भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली मिशन 400 अशी योजना तयार केली आहे.
मिशन-400 मध्ये भारतीय फलंदाजावर मोठी जबाबदारी असून, पहिल्या डावात किमान 400 धावांचा टप्पा गाठायचा आहे. कसोटी सामन्यात बहुधा गोलंदाज हे सामना जिंकवण्याच्या भूमिकेत असतात, तर फलंदाज सामना वाचवण्याच्या. मात्र, या अंतिम लढतीत भारतीय संघ फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करून विजय निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रत्येक डावात किमान 400 धावा उभारण्याचे उद्दिष्ट भारतीय संघाने बाळगले आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेच्या साखळी फेरीमध्ये आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून, एक सामना अनिर्णित राहिला. इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. विजयासाठी भारतीय संघ मिशन 400 चा अवलंब करणार असला तरी आतापर्यंत या स्पर्धेत झालेल्या सामन्यांत संघाने एका डावात 400 धावांचा आकडा केवळ 5 वेळाच पार केला आहे. ज्यातील 4 सामने भारतात झाले होते. केवळ एकदाच परदेशात भारतीय संघाने एका डावात 400 धावा केल्या आहेत. आजपर्यंतच्या कसोटी सामन्यांत भारतीय संघाने परदेशातील खेळपट्टीच्या तुलनेत मायदेशातच जास्त विजय मिळवले आहेत.
भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजासह शुभमन गिल व ऋषभ पंत यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत. तसेच हनुमा विहारी व रवीचंद्रन आश्विनसारखे उपयुक्त फलंदाज असल्याने भारतीय संघाला 400 धावांचा आकडा पार करणे शक्य मानले जात आहे.
कोहलीला अनोख्या कामगिरीची संधी
भारतीय संघाला क्रिकेटच्या तीनही प्रकारात पहिल्या स्थानी आणण्यात मोलाचा वाटा घेत असलेल्या कर्णधार विराट कोहलीचे वर्चस्व कायम राहिले आहे. कोहलीला आता आपल्या नावावर पहिल्या वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा करंडकही आपल्या नेतृत्वात जिंकण्याची नामी संधी आहे. 2019 सालचा विश्वकरंडक जिंकण्याची संधी होती. मात्र, संघ उपांत्यफेरीतच गारद झाला. त्यामुळे ही स्पर्धा जिंकत अपयश मागे टाकण्याची भारतीय संघाला संधी मिळाली आहे.