नवी दिल्ली – भारताने मायदेशात इंग्लंडला धूळ चारत मालिकेत 3-1 अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. 18 जूनपासून लॉर्डसच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करेल.
भारतीय संघाने आयसीसीच्या जागतिक स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरी गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारताने टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरी गाठली होती. तसेच विजेतेपद देखील पटकावले होते. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्याही पहिल्याच हंगामात भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघ 1932 सालापासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच लॉर्डस वरील सामन्यात भारत त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मात्र यापूर्वी त्रयस्थ ठिकाणी 6 सामने खेळला आहे. हे सहाही सामने न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध खेळले असून हे सामने अबूधाबी, दुबई आणि शारजा येथे खेळल्या गेले आहेत. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी खेळण्याच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडमध्ये भारताने 62 कसोटी सामने खेळले असून त्यातील 7 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 54 सामने खेळले आहेत. यातील 5 कसोटी सामन्यात त्यांना विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे दोन्हीही संघांचे रेकॉर्ड साधारण सारखेच आहेत. लॉर्डसबाबत बोलायचे झाल्यास भारताने 18 पैकी दोन, तर न्यूझीलंडने 17 पैकी केवळ एक सामना जिंकला आहे.
लॉर्डस वेगवान गोलंदाजांना अनुकूल
लॉर्डसच्या मैदानाची खेळपट्टी पारंपरिकरित्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. भारताने या मैदानावर शेवटचा सामना ऑगस्ट 2018 मध्ये खेळला होता. यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी हरवले होते. यात भारताच्या सगळ्या विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. त्यामुळे येत्या अंतिम सामन्यातही असेच चित्र राहण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडकडे अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून टीम साउदी आणि ट्रेंट बोल्ट उपलब्ध असून भारताकडेही महंमद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत.