यंदाच्या जागतिक मृदा दिनाची संकल्पना : वृक्षसंवर्धनासह पालापाचोळा हाच उपाय
पुणे – वृक्षतोडीमुळे जमिनीतील कार्बन कमी होत असून, त्यातील तग धरून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे. तर रस्ते, जमीन, बागेतील पालापाचोळा, ओले गवत म्हणजे कचरा असल्याचे मानत ते स्वच्छ केले जाते. यामुळे जमिनीची धूप वाढत आहे. त्याचे दिसून येत आहेत. जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनासह पालापाचोळा, ओले गवत यांना कचरा न मानता त्यांचा वापर करून जमिनीची धूप रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दि. 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासानुसार, जगभरात आतापर्यंत 33 टक्के जमिनीची धूप झाली असून, 2050 पर्यंत हे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2017 साली दिल्ली येथे प्रकाशित झालेल्या एका शोधपत्रकानुसार भारतात दरवर्षी तब्बल 16 टन प्रतिहेक्टर इतक्या प्रमाणात जमिनीची धूप होते. तापमान, शेती, पाणी आणि हवा या कारणांमुळे जमिनीची धूप वाढत आहे. साहजिकच याचा परिणाम एकूण कृषी उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेवरही होतो. यंदाच्या मृदा दिसवासाठी “जमिनीची धूप थांबवा, भविष्य वाचवा’ ही संकल्पना आहे.
व्यापक अभ्यासाची गरज
जमिनीची धूप होण्यासाठी अनेक कारणे आहेत. भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारने आढळतात. त्यामुळे मृदा संवर्धनासाठी केवळ एक मॉडेल अवलंबता येत नाही. विविध भौगोलिक रचना आणि प्रदेशांचा बारकाईने अभ्यास केल्यावरच त्या-त्या प्रदेशानुसार सक्षम उपाय योजना राबवता येणे शक्य ठरेल, त्यामुळेच मृदा संवर्धनासाठी हवा अधिक सूक्ष्म स्तरावर आणि व्यापक अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे.
जमिनीची धूप ही मुख्यत्त्वे तेव्हाच होते, ज्यावेळी उघड्या स्वरूपात असते. जमिनीवर जर पालापाचोळा, ओले गवत, तण यांचे आवरण असल्यास जमिनीची धूप रोखण्यास मोठी मदत मिळेल. हा अतिशय सोपा आणि कोणतेही खर्च न करता अवलंबता येणारा उपाय असून, त्याचे योग्य नियोजन केल्यास जमिनीची धूप रोखण्यासाठी यामुळे फायदा होणार आहे.
– आदिती देवधर “ब्राउन लीफ’ संस्थाप्रमुख