मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी वेळीच घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पिंपरी – करोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे सध्या मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही चिंता रोगाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन केले जात आहे.
सध्याचे आयुष्य धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विभक्त कुटुंबपद्धती, नातेसंबंधातील वाढत चाललेला दुरावा, “डेडलाइन’चा असलेला तणाव यामुळे मानसिक समस्यांची गुंतागुंत वाढली आहे. मानसिक आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविता आले नाही, तर नकारात्मकता वाढीस लागते. त्यातून आत्महत्येसारख्या घटना पुढे येत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम नोकरी गमावणे, पगार कपात, उद्योग-व्यवसायातील तोटा, कर्जाचा वाढत चाललेला बोझा अशा विविध समस्यांनी बरेच जण त्रस्त झाले आहेत. परिणामी चिंता रोगाचे रुग्ण वाढले आहेत.
“मानसिक आरोग्य’ नावाची काय गोष्ट असते हेच अनेकांना माहीत नसते. मानसिक आरोग्याविषयी वेगळा विचार करायला हवा, हा विचार अद्यापही समाजात रुजलेला नाही. देशामध्ये जे मानसिक आरोग्यविषयक धोरण आहे त्यामध्ये विशेषज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता आरोग्यविषयक सोयींमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांमध्येच मानसिक आरोग्यविषयक उपचार पुरवण्यावर भर दिला आहे.
काय कराल ?
– परिस्थितीचा स्वीकार करा.
– सकारात्मक विचार बाळगा.
– स्वत:वर संयम ठेवा.
– स्वस्थ आणि आनंदी रहा.
– मनमोकळा संवाद साधा.
करोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी सध्या मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही चिंता रोगाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
– डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ