1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 15 मे हा दिवस “जागतिक कुटुंब दिन’ म्हणून घोषित केला. वैश्विक कुटुंबाला जोडणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक, सामाजिक घटकांचा कुटुंबावर पडणारा प्रभाव आणि कुटुंबाविषयी इतर मुद्द्यांना विशेष प्राधान्य देण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे.
आजचा जागतिक कुटुंब दिन मात्र वेगळा आहे. लॉकडाऊनमुळे आज कुटुंबासोबत असलेले आणि नसलेले लोक अशी लोकांची दोन ठळक भागात विभागणी करता येईल. कुटुंबासोबत असलेल्यांचा आजचा दिवस खूप आनंदात जाईल, जे कुटुंबापासून लांब आहेत त्यांच्यासाठी मात्र यातनामय असेल, हे कुणीही नाकारू शकत नाही. कारण आपल्या कुटुंबाप्रती सर्वांना एक अनामिक ओढ असते. आपल्या कुटुंबावर प्रत्येकजण जीवापाड प्रेम करतो. कुटुंबाच्या सुखासाठी प्रत्येकजण धडपडतो. यातूनच कुटुंब वात्सल्य निर्माण होऊन जागतिक एक कुटुंब निर्माण होते…
आज जागतिक कुटुंब दिन. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर कुटुंबातील सर्वजण सक्तीने का होईना; पण सोबत आहेत, असे आजच्या कुटुंब दिनाचे विशेष. सक्तीने यासाठी म्हणावेसे वाटते की, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतातच नव्हे तर जगातही लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी सर्वांना घरातच राहणे बंधनकारक आहे.
अनेक कुटुंबातील सर्वजण आज पहिल्यांदाच एकत्र येऊन हा दिवस साजरा करण्याचा योग आला आहे. आभासी दुनियेमुळे आज जवळचा माणूसही दूर लोटला गेला होता. सर्वांना कामाची गडबड, धावपळ यामुळे आपल्या कुटुंबाकडे पाहिजे तेवढे लक्ष देता येत नाही. आज सर्वजण घरीच असल्यामुळे सर्वांशी संवाद साधता येत असल्यामुळे कुटुंब पुन्हा खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे, असे वाटते. करोनाचे संकट डोक्यावर घिरट्या घालत असतानाही घरच्यांचा आधार असल्यामुळे सर्वांना हायसे वाटत आहे.
आई-वडिलांना कामाच्या ताणामुळे मुलांसाठी वेळ नव्हता. तो आज पूर्ण वेळ त्यांना आपल्या पाल्यांसाठी देता येत आहे. वृद्ध आईवडिलांकडे बऱ्याचजणांचे नाईलाजाने थोडेसे दुर्लक्ष होतेच, आज त्यांच्यासाठी भूरपूर वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधत पुन्हा वृद्ध आईवडिलांना आपली हरवलेली मुले परत मिळाल्यासारखेच वाटत असावे. घरातील महिलांना दिवसभर घरकामांतून उसंत मिळत नाही. आज पुरुष वर्गाकडून त्यांच्या कामात थोडाफार हातभार लागत असल्यामुळे कुटुंबातील सुख-दुःख खऱ्या अर्थाने सर्वांनी वाटून घेतले असल्याचे चित्र तयार झाले आहे.
मात्र नाण्याला ज्या प्रकारे दोन बाजू असतात, प्रत्येक घटनेला सुखाची व दुःखाची किनार असते अगदी त्याचप्रमाणे आजची स्थिती झाली आहे. काही लोक आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने राहत आहेत तर दुसरीकडे लॉकडॉऊनमुळे आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्यांच्या डोळ्यांत दुःखाची छटा दिसते आहे. घराची ओढ ही नैसर्गिक असते. बरेच जण आपल्या बायकोमुलांशिवाय, वृद्ध आईवडिलांना भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्या ओढीने आज अनेक लोक पायी आपापल्या घराकडे निघाल्याचे चित्र भारतभर दिसत आहे. या लोकांना आजचा जागतिक कुटुंब दिन एकत्र साजरा करता येणार नाही, याचे त्यांना दुःख असणार. या लोकांपैकी अनेक गरीब अडाणी लोक असतील ज्यांना आज जागतिक कुटुंब दिन आहे याची माहितीसुद्धा नसणार, तरी घराच्यांना लवकर भेटता यावे ही आतुरता मात्र त्यांना आहेच.
या लोकांच्या बायकामुलांचे आणि आईवडिलांचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागलेले आहेत. त्यांनी सुखरूप आपल्या घरी यावे हीच इच्छा आता त्यांची उरली असेल. या लोकांवरच त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून असते. दर महिन्याला कामाच्या मोबदल्यात मिळालेले पैसे घरी पाठवणे आणि त्या पैशांत मुलांच्या शाळेचे शुल्क असेल, कपडे असेल, औषधपाणी असेल यावर घरच्यांनी पैसे खर्च करावे आणि जे काही पैसे उरले असतील नसतील त्यावर संसाराचा गाडा हाकलणे असे या लोकांचे ठरलेले जीवन. मात्र लॉकडाऊनच्या काळात हे पैसे मिळाले नसल्याने या कुटुंबाचे हाल सुरू आहेत.
सध्या कुटुंबापासून लांब असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचीही फरफट होत असल्याचे दिसत आहे. स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरावे या एकाच कारणास्तव ही मंडळी घरापासून लांब राहून कामधंदा करते.
मात्र, आज तेच अर्धपोटी असल्यामुळे आणि खिशात एक छदामही नसल्यामुळे आपल्या कुटुंबाचे पुढे काय होणार, या विचारानेच त्यांच्या पोटात धस्स होत असेल. सर्वांचे कुटुंब सुखी राहो हीच जागतिक कुटुंब दिनानिमित्त मनीषा.