पुणे – अपघातात खूप रक्त गेले आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता आहे… शस्त्रक्रिया करावी लागेल ब्लड बॅंकेतून रक्ताची सोय करून ठेवा… डेंग्यू झालाय रक्त पाहिजे… वेळेत रक्त मिळाले नाही तर रुग्ण दगावू शकतो, ही वाक्ये ऐकताच नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ सुरू होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने रक्तदानाचे महत्त्व कळते. आपण केलेले रक्तदान एखाद्याला जीवनदान देत असते, त्यामुळे दरवर्षी रक्तदान करणे ही आपली जबाबदारी नव्हे तर कर्तव्य आहे.
14 जून जागतिक रक्तदान दिवस. देशात रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. परंतु आजही उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ब्लड बॅंका, रुग्णालये आणि सामाजिक संस्थांना उन्हाळ्यामध्येही रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. देशात दरवर्षी साधारण 1 कोटी 10 लाख रक्तदान होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक तरुण आजही रक्तदान करत नाही. रक्तदान केल्यावर शरीरावर काहीतरी परिणाम होईल, या चुकीच्या समजामुळे देशात रक्तदानाचा टक्का अजूनही कमीच आहे.
दरम्यान, पुणे शहरात रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होते. विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रतिष्ठान, राजकीय व्यक्ती यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालय सुरू असल्यावर शिबिरांची आणि रक्तदात्यांची संख्या वाढते. मात्र, एप्रिल, मे महिन्यांत ही संख्या घटते आणि रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे नियोजन करून, टप्प्या टप्यात काम झाले पाहिजे.
शहरासह राज्यात स्वेच्छा रक्तदानाचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. रक्तदानाचा टक्का वाढवायचा असेल, तर वाढदिवसाबरोबरच स्मृती दिन, लग्नसमारंभ यावेळी रक्तदान करून रक्तदान चळवळीला आणखीन पुढे नेऊ शकतो, असे रक्तदान क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन यांनी सांगितले.
एका प्रसंगामध्ये रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या तरुण मुलाला रक्ताची आवश्यकता होती. त्यासाठी त्याचे नातेवाईक रक्त मिळत नसल्यामुळे रडत होते. त्यावेळी मी रक्तदान केल्यावर नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील आनंद मोठा होता. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. मी आतापर्यंत 99 वेळा रक्तदान केले. रक्तदान हे कोणत्याही गिफ्टसाठी नाही तर एखाद्याचा जीव वाचेल या भावनेतून करतो.
– जितेंद्र भालेराव, रक्तदाता