नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था अधिक सकारात्मक दिशेने वाटचाल करीत असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. जागतिक बॅंकेने 2022- 23 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर वाढून 6.9% होईल असे भाकीत केले आहे. अगोदर बॅंकेने भारताचा विकासदर 6.5% राहील असे म्हटले होते. मात्र आता या अंदाजात बॅंकेने सुधारणा केली आहे.
जगात अनेक नकारात्मक घडामोडी घडत असूनही भारत मात्र या घडामोडीचा स्वतःवर परिणाम न होऊ देता उत्पादकता वाढवीत आहे. दुसऱ्या तिमाहीचे ताळेबंद नुकतेच जाहीर झाले असून बहुतांश कंपन्यांनी आपल्या उलाढालीत आणि नफ्यात वाढ नोंदविली आहे. त्यातल्या त्यात बॅंकिंग आणि वाहन क्षेत्राच्या नफ्यात जास्त वाढ झाली आहे. या सर्व बाबीचा विचार करता यावर्षी भारताचा विकास दर वाढून 6.9% होईल असे जागतिक बॅंकेला वाटते.
पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर 13.5% तर दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के इतका नोंदला गेला आहे. अमेरिकेसह जगातील इतर बॅंकांनी व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. मंदीमुळे जागतिक व्यापार कमी होणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या विकासदरावर थोडाफार परिणाम होणार असला तरी भारताचा विकास दर जगात सर्वात जास्त म्हणजे 6.9 टक्के राहील.
गेल्या वर्षी भारताचा विकासदर तब्बल 8.7 टक्के होता. मंदी आणि इतर कारणामुळे 2022 ते 23 या आर्थिक वर्षात जगाचा विकासदर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या वर्षात भारताचा विकास दर कमी होऊन 6.6% इतका होणार असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले आहे. कारण या कालावधीत भारताला निर्यातीचा फार कमी आधार मिळणार असल्याचे बॅंकेला वाटते.
महागाई नियंत्रणात राहील
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यामुळे महागाई यावर्षी साधारणपणे सात टक्के तर पुढील वर्षी 5.2% राहील. केंद्र सरकार योग्य व्यवस्थापन करीत असल्यामुळे यावर्षी वित्तीय तूट 6.4% च्या पुढे जाणार नसल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.