मंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या व लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, जनता दरबारच्या माध्यमातून, तसेच गावभेट दौऱ्यावेळी अनेक गावांच्या शिष्टमंडळांनी मागणी केल्यानुसार लोकहिताच्या महत्त्वाच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत प्रामुख्याने मरकळ (ता. खेड) येथील भामा आसखेड कालव्यासाठी जमिनीचे केलेले संपादन वगळण्याबाबत शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली.
यासह डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील गायरान क्षेत्रावरील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी व्हावेत, हडपसरमधील मांजरी बुद्रुक या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी “शासन आपल्या दारी’चे आयोजन व्हावे, कवठे यमाई येथील शेकडो एकर क्षेत्रावरील चुकीचे भोगवटादार शिक्के कमी व्हावेत यांसह विविध प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
विविध गावच्या शिष्टमंडळाचे म्हणणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तरपणे ऐकून घेत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणेबाबत संबंधित खाते प्रमुखांना आदेश दिले. या बैठकीबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य शरदराव बुट्टे पाटील, जिल्हा परिषद गटनेते दे विदास दरेकर, पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, मांजरीचे सरपंच शिवराज घुले पाटील, कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांसह विविध गावांचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.