मॉन्सूनपूर्व तयारी ः नाले-ओढ्यांच्या साफसफाईत दिरंगाई
15 मे पर्यंतची दिली होती मुदत
नैसर्गिक व्यवस्थेत हस्तक्षेप धोकादायक
शहरात पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाह म्हणून बहुतांशी ठिकाणी ओढ्यांची निर्मिती झालेली असते. मात्र, विकासात्मक शहराच्या नावाखाली सर्व नियमांना धाब्यावर बसवून कित्येक ओढे-नाले बुजविण्यात आले आहेत. ओढे-नाले हे नैसर्गिक जलप्रवाह असल्याने त्याद्वारे अतिरिक्ति पाणी वाहून योग्य ठिकाणी घेऊन जातात. शहरात या ओढे-नाल्यांना बुजवून त्यावरती मोठ-मोठी अनधिकृतपणे बांधकामे तयार करण्यात आली आहेत. नैसर्गिक व्यवस्थेत विकासाच्या नावाखाली करण्यात आलेला बदल धोकादायक ठरू शकतो. यामुळे, शहरातील नैसर्गिक प्रवाह कमी झाल्याने थोडा पाऊस पडला तरी रस्त्यावरती पाणी येऊन तलावाचे स्वरुप येत आहे. तसेच, पावसाळी ड्रेनेज लाईनमध्ये पावसाचे संपूर्ण पाणी वाहून नेण्याची क्षमता नसल्याने ओढे-नाल्यांचे प्रवाह बंद होणे शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे.
पिंपरी – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने शहरातील सर्व नाले व ओढ्यांची साफसफाई करण्यासाठी 15 मे पर्यतची मुदत दिली होती. मात्र, मुदत उलटूनही शहरातील नालेसफाई अपूर्णच असल्याचे दिसून आले आहे. यामुळे, नालेसफाई करण्यासाठी महापालिकेला अजून किती दिवस लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आठवड्यापूर्वी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त दालनात बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत शहरातील नालेसफाई 15 मेपर्यत पूर्ण करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांना सांगितले होते. याबाबत, संबंधित विभागालाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही शहरातील कित्येक भागातील ओढे-नाल्यांची साफसफाई अपूर्णच आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यापूर्वी कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाईची मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेचा वेग मंदावला असल्याचे दिसत आहे.शहरातील सर्व नाले, गटारांची कामे, आपत्कालीन परिस्थितीकरता आवश्यक यंत्रणांची तयारी, नियंत्रण कक्ष, पाणी निचरा करणारी यंत्रणा, धोकादायक झाडे आदी बाबी मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, काही कामे अद्याप सुरुही झालेली नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 200 हून अधिक लहान-मोठे नाले आहेत.
या नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्यास डासांची पैदास होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. नाल्यांमध्ये कचरा साचून पाणी तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊन दुर्गधी पसरते. यामुळे, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे, पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाने ओढे-नाले सफाईच्या मोहिमेची गती वाढविणे आवश्यक आहे.
शहरातील बहुतांशी भागातील ओढे-नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. ज्या भागातील नाल्यांची साफसफाई करताना अडचणी निर्माण होत आहेत त्या ठिकाणी जेसीबी व इतर मशिनरीच्या सहाय्याने साफसफाई केली जाणार आहे. शहरातील फुलेनगर परिसरातील मोठ-नोठ्या नाल्यांची साफसफाई झाली आहे. याचबरोबर, कासारवाडी, यमुनानगर, सुदर्शननगर व शहरातील इतर काही ठिकाणचा भाग राहिला असून त्या ठिकाणी लवकरात-लवकर साफसफाई केली जाणार आहे.
डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी