नवी दिल्ली – संसदेने मंजूर केलेल्या कामगार संहितेत दिवसातील कामाचे जास्तीत जास्त ( कमाल) आठ तास ठेवण्याचा इरादा जाहीर केला होता. आता कामगार मंत्रालयाने दिवसाचे जास्तीत जास्त कामाचे तास 12 करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. यामध्ये मधल्या सुट्टीचा समावेश आहे.
असे असले तरी आठवड्याचे कामाचे एकूण तास 48 ठेवण्यात आले आहे. यामध्ये सहा दिवसांच्या प्रत्येकी आठ तासांचा समावेश आहे. भारतातील विविध क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दिवसाचे कामाचे जास्तीत जास्त 12 तास करण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे, असे कामगार मंत्रालयाचे म्हणने आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाला तर कामगारांना अधिक ओव्हर टाईम मिळू शकतो. आठ तासापेक्षा अधिक काम केल्यास ओव्हरटाईम देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. 15 ते 30 मिनिट जास्त काम केल्यास तो कालावधी 30 मिनिटांचा गृहीत धरण्यात येईल. सध्याच्या नियमानुसार 30 मिनिटांपेक्षा कमी काळ जास्तीचे काम केल्यास तो ओव्हरटाइम गृहीत धरला जात नाही.
आठवड्यातील कामाचे तास दिवसाला आठ तास याप्रमाणे 48 तास बंधनकारक करण्यात येणार आहेत. कामगाराला सलग पाच तासांपेक्षा जास्त काम करू दिले जाणार नाही. संसदेने मंजूर केलेल्या प्रस्तावात मात्र कोणत्याही कामगाराला दिवसाला आठ तासांपेक्षा जास्त काम नसत नसावे असे म्हटले आहे.