राजधानीत जाऊनही भेटीसाठी वेळ नसल्याची दौंडमधील शिवसैनिकांची खंत
चौफुला – शिवसेनेतील बंडामागे एक कारण होते, ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी वेळ देत नव्हते. भलेही या आमदारांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली असली तरी ते एक महत्वाचे कारण समजले जात होते. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा जनतेचा प्रश्न आहे. दौंड तालुक्यातील कट्टर शिवसैनिक आपल्या कुटुंबीयांसमवेत मातोश्रीवर गेले होते. परंतु आजही पक्षप्रमुखांना कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावरुन पक्षप्रमुखांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे.
नानगाव (ता. दौंड) येथील रहिवासी मोहन यादव गेल्या 40 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. यापूर्वीही ते शिवसेनेचा प्रचार करीत मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांची भेट घेत विचारपूस करीत असत. परंतु आता तसे राहिले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमठत असल्याचे दिसून येत आहे. मोहन यादव हे कुटुंबीयांसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते. पण त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मोहन यादव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होईल म्हणून सकाळी आठच्या दरम्यान मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांनी ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्नही केला परंतु त्यांना भेटता आले नाही. शिवाय पावसाची रिमझिम सुरू असताना ते तटस्थ होते. दुपारपर्यंत त्यांना भेट मिळालेली नव्हती. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांनीही पक्षप्रमुख हे भेटण्यासाठी वेळच देत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे तर मार्गी लागतच नव्हती पण आमदारांच्या नाराजीचे हे एक मुख्य कारण होते. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मोहन यादव यांची स्वत:ची भगवी अशी ओळख आहे. शिवाय ते गेल्या 40 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत.
त्यांच्या लक्षणीय प्रचारामुळे ते मातोश्रीवर आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील माझी भेट घेत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु आता पक्ष प्रमुखांना कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळच नाही ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. एवढे सर्व असतानाही आता पक्षाच्या झालेल्या परस्थितीवर यादव यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मुंबई सारख्या शहरात राहणे अशक्य असते. परंतु पक्ष प्रमुखांची भेट न झाल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नाराजी वाढत आहे. याबाबत पक्ष प्रमुखांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
मातोश्रीवर जाऊनही पक्ष प्रमुखांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. जरी मी नाराज असलो तरी पक्षाशी एकनिष्ठ आहे. संघटनात्मक बदलानंतर शिवसेना पुन्हा उभारी घेणार असा मला विश्वास आहे.
– मोहन यादव, शिवसैनिक दौंड.