पुरामुळे ऊस पिकाला बसला फटका : उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटणार
पुणे – सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत राज्यातील एकवटलेल्या साखर कारखानदारीला पुराचा मोठा फटका बसला आहे. ऊस पिकाचे बाधित क्षेत्र हजारो एकरांमध्ये आहे. त्यामुळे ऊसाचे पीक किती प्रमाणात हाती लागणार आहे. यावरच ऊसतोड कामगारांचे स्थलांतराची आकडेवारी ठरणार आहे. पुराचे थैमान लक्षात घेता यंदा ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरावरच मर्यादा येणाची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात स्थलांतर करीत असतात. घरदार सोडून उसाच्या फडात कष्टाचे काम करतात. टनभर ऊस तोडल्यानंतर दोनशे रुपये त्यांच्या पदरात पडतात. मजुरांना दरवर्षी मुकदामाकडून आगाऊ रक्कम (उचल) दिली जाते. गेल्यावर्षी कामधंदा नसल्याने सुशिक्षित वर्ग वळाल्याने मजुरांच्या संख्येत सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली होती.
राज्यात व राज्याबाहेर जाणारे पंधरा लाख मजूर आहेत. त्यातील दहा लाख कामगार हे राज्यातील 200 साखर कारखान्यांमध्ये काम करतात. बीड जिल्हा हा राज्यात ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यातील पाच ते सहा लाख कामगारांचा समावेश असतो. बीड जिल्ह्याला जोडून असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा, कर्जत या तालुक्यातील मजूर ऊसतोडणीचे काम करतात. याशिवाय जळगाव, चाळीसगाव, जालना, परभणी, उस्मानाबाद, नंदेड हिंगोलीतीलही मजूरदेखील ऊसतोडीचे काम करू लागले आहेत. यंदा ऊसतोडीचा प्रश्न गतवर्षीच्या तुलनेत आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साखर कारखान्यांना बसणार फटका
राज्यात असलेल्या 200 साखर कारखान्यांपैकी सातारा, सांगली व कोल्हापूर या पश्चिमपट्टयात पुराने थैमान घातल्याने त्या भागातील कारखान्यांचे ऊस क्षेत्र घटण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसण्याची चिन्हे आहेत.