लखनौ – निवडणूक निकालाने निराश होऊ नका. विजय मिळत नाही तोपर्यंत दुप्पट ऊर्जेने कार्य करा, असा कानमंत्र कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसजनांना दिला.
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्या पक्षाच्या हाती 403 पैकी केवळ 2 जागा आल्या. कॉंग्रेसची ती उत्तर प्रदेशातील आजवरची नीचांकी कामगिरी ठरली. त्या निकालानंतर उत्तर प्रदेश कॉंग्रेसने प्रथमच नवसंकल्प कार्यशाळेच्या रूपाने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
त्यामध्ये बोलताना प्रियंका यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. नाउमेद न होता आपल्याला पुढील मार्गक्रमण करावे लागेल. मी तुमच्या बरोबरीने दुप्पट ताकदीने कार्य करेन, असे त्या म्हणाल्या.
केवळ राजकीय मुद्देच नव्हे; तर सामाजिक मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत पोहचू. सत्ताधारी भाजप देशाला चुकीच्या दिशेने नेत आहे. जनतेपुढे आपण सत्य मांडू, असेही प्रियंका यांनी म्हटले. कॉंग्रेसने उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्या निवडणुकीसाठी प्रियंका यांनी झंझावाती प्रचार केला. मात्र, कॉंग्रेस पक्ष प्रभाव पाडू शकला नाही.