नगर – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या पक्षात घुसमट होत आहे. त्यांची मानसिक अवस्था काय आहे हे त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न असला, तरी पंकजा मुंडे व त्यांच्या नेत्यांनी तो एकत्र बसून सोडवावा. परंतु ओबीसी नेत्यांना राजकीयदृष्ट्या त्रास देण्याचा विषय देशभर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी (दि. 9) नगरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या मैदानाची पाहणी पाटील यांनी केली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील 20 ते 22 जागांवरील उमेदवारांची चाचपणी आत्तापर्यंत केली आहे. त्यानंतर 14 जूनला मुंबईत उर्वरित जागांची चाचपणी होईल.
राज्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आम्ही यापूर्वी सरकारकडे मागणी केली होती. परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकारने इतर सर्व “इव्हेंट’ थांबवून त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.
नगरचे नामांतर घाईगडबडीत…
दिल्लीत सावरकरांच्या कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला काढण्यात आले. या घटनेचे पापक्षालनासाठी सरकारने अत्यंत घाईगडबडीत नगरचे नामांतर करण्याचा घाट घातला. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही प्रस्ताव न आणता निर्णय जाहीर करण्यात आला, यामागे पापक्षालनाचा हेतू दिसतो, अशी टीकाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री संख्याबळावरच!
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला फलक झळकवण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती नरहरी हिरवळ यांनीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, कॉंग्रेसच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही. ज्यांची नावे पुढे येतील त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. मी, हिरवळ किंवा अजित पवार असोत, आम्हा सर्वांना संख्याबळाशिवाय हे शक्य नाही हे माहीत आहे.