सविंदणे : मलठण -शिरूर रस्त्यावरील ओढयावरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अर्धवट स्थितीत आहे. सध्या ओढयाला पाणी असल्यामुळे व रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे .
सदर पुलाच्या कामाच्या ठिकाणी खोदकाम करून ठेवल्यामुळे गाडया घसरून मोठा अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्याठिकाणी वळण असल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. घटनास्थळी यापुर्वी अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्वरीत रखडलेल्या रस्त्याच्या पुलाचे काम ठेकेदाराने पुर्ण करण्याची मागणी मलठणचे सरपंच प्रकाश गायकवाड व किरण देशमुख यांनी केली आहे.
शिरूर -मलठण मार्गे खेड, मंचर, नारायणगाव, भिमाशंकर, नाशिक येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर कायम वर्दळ असते त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम लवकर व्हावे अशी इच्छा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.