वाघोली : पुणे-नगर महामार्गावर रात्रीच्यावेळी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना एका लेनवरून दुसऱ्या लेनवर वाहतूक वळविली असताना रिफ्लेकटर, तात्पुरते दुभाजक व सुरक्षेचे काळजी घेतली गेली नसल्यामुळे वाघेश्वर मंदिर चौकात ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून चालक जखमी झाले आहेत.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. सुरु असलेल्या कामामुळे पुणेकडून नगरकडे जाणारी वाहतूक बंद करून दोन्हीकडील वाहतूक एकाच लेनवरून सुरु होती. काम सुरु असताना तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येणारे रिफ्लेकटर, दुभाजक व वाहनांना दिशा दाखविण्यासाठी लावण्यात येणारे फलक स्पष्टपणे लावले गेले नव्हते. याचाच फटका महामार्गावरील वाहनांना बसला असून रात्री साडे दहाच्या सुमारास ट्रक व टेम्पोची जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला.
अपघातात मालाने भरलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला होता. जेसीबीच्या सहाय्याने उचलून ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर स्थानिक तरुण मदतीसाठी धावले. दोन्ही चालकांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता रात्रीच्या वेळी काम सुरु असल्याने महामार्गावर 2 वाहनांना जबर फटका बसला असून वाहनांचे नुकसान झाले आहे. वाहनचालकांचे नुकसान टाळण्यासाठी कंत्राटदाराने योग्य काळजी घेऊन काम करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे-नगर महामार्गावर चालू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह नागरिकांमधून प्रचंड नाराजीचा सूर निघताना दिसून येत आहे. बहुतांश काम पूर्णत्वाकडे आले असून कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सांशकता निर्माण होत असल्यामुळे कामाची गुणवत्ता नियंत्रण तपासणी होणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी काम पूर्ण होण्यापूर्वीच खडी उखडलेली दिसून येत आहे. संबधित अधिकारी “काम बघून संबधित ठेकेदाराला सूचना करतो” या साचेबद्ध उत्तरामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे महामार्ग रामभरोसे असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
‘नगर महामार्गावर चालू असलेल्या कामाबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. कामाचा दर्जा व सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजना कराव्यात. लॉकडाउन काळ असल्याने ठेकेदाराकडून जाणीवूर्वक निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे.’
– चिराग राजेंद्र सातव पाटील
( युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा )