सपकाळवाडीत ग्रामस्थ आक्रमक : स्फोटामुळे घरांचे, शेतीचे होतेय नुकसान
भवानीनगर – “पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ असा नारा देत सपकाळवाडी (ता. इंदापूर) येथे नीरा-भीमा स्थिरीकरण नदीजोड प्रकल्प बोगद्याचे काम रविवारी (दि. 20) बंद पाडले. यावेळी कामावरील अधिकऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.
नीरा-भीमा नदी जोड बोगदा जमिनीपासून 100 ते 110 फूट खालून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे कूपनलिकांचे पाणी गायब झाले आहे. त्याचप्रमाणे बोगद्यामध्ये जो स्फोट केला जातो. त्याची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे की घरांना तडे जाऊन भिंतींना मोठ्या भेगा पडत आहेत. त्यामुळे घरांचे, शेती व शेतीपूरक व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बोगद्याच्या एक किलोमीटर परिघातील भूजल पातळी खालावलेली आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी पूर्णतः संपण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच बोगद्यामध्ये जे स्फोट घेतले जातात त्या स्फोटाची तीव्रता अधिक असून हे स्फोट रात्री केल्याने या भागातील जमीन पूर्णपणे हादरली जात आहे. यामुळे झोपलेले लोक देखील जागे होऊन भयभीत होत आहेत.
या कामामुळे सपकळवाडी गावाजवळील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आणि पुढील काळातील येणाऱ्या अडचणी याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सरपंच सचिन सपकळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका युवक उपाध्यक्ष तुषार सपकळ, आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
…तर या भागातील शेतीचे वाळवंट
आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवंलबून आहे. जर आमच्या शेतीच्या खालून बोगद्याद्वारे पाणी जाणार असेल तर आमच्या शेतातील विहिरींना, कूपनलिकांना कसे पाणी राहणार? हा प्रकल्प इतर ठिकाणी पाण्याची सोय करण्यासाठी होत आहे. मात्र, या भागातील शेतीचे वाळवंट होणार आहे. त्यामुळे आमच्या घरांची, शेतीचे व शेती व्यवसायाच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन करून भरपाई मिळावी. बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत, शेतकऱ्यांना नीरा डावा कालवा यातून कायमस्वरूपी परवानगी देऊन या कामाचा खर्च सरकारने किंवा संबंधित कंत्राटदारमार्फत करून देण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.