वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ते लोहगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वाघोली ते लोहगाव या राज्यमार्गावर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर वाघोली हद्दीत खड्ड्यांचे साम्राज्य वाढून नागरिकांना त्रास होत होता. याबाबत पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव पाटील, शिवसैनिक सागर गोरे, यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते.
“वाघोली ते लोहगाव रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
– कल्पेश जाचक(अध्यक्ष,श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान)
कालांतराने परत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढू लागल्याने नागरिक ये-जा करताना त्रस्त झाले होते. याबाबत रस्त्यांची कायमस्वरूपी डागडुजी करण्यात यावी यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे रस्त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे बाबत मागणी केली होती. त्याचप्रमाणे वाघोली तालुका हवेली येथील श्री शिवछञपती प्रतिष्ठानच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला भरीव निधी उपलब्ध करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेसाठी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
– बाळासाहेब सातव पाटील(उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
वारंवार खड्ड्यांचे साम्राज्य वाढत असल्याचे पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून त्यांनी जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत डांबरीकरणास खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. राजकीय पक्ष व सामाजिक संघटना नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याने नागरिकांकडून राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे कौतुक होत आहे.
सा.बा.विभाग (दक्षिण) कडुन वाघोली- लोहगाव रोडवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, प्रतिष्ठानचे सदस्य सुधीर दळवी, शिवदास पवार, कल्पेश जाचक,हरिभाऊ पाचर्णे आदींनी पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.