पुणे- कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता म्हणून अनेक आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. मात्र घरुन काम करताना कंपनीच्या उत्पादकता आणि कामगिरीवरही विपरीत परिणाम झाला आहे. घरुन काम करणाऱ्या आयटीतील कर्मचाऱ्यांची कामगिरी 30 टक्क्याने घसरली आहे, असं नाईट फ्रँक इंडियाच्या सर्व्हेतून समोर आले आहे.
या सर्व्हेत मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 6000 कर्मचाऱ्यांना सहभागी केले होते. वर्क फ्राॅम होम याबाबत अनेकांचे मत विचारण्यात आले. प्रवासाचा वेळ वाचतो, असं 60 टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं तर प्रवासाचे पैसे वाचतात असं 58 कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र कामाची कमतरचा जाणवत असल्याचंही काही कर्मचाऱ्याचं मत होतं.
या अहवालानुसार देशातील आयटी उद्योग आपल्या कामकाज उत्पन्नाच्या 4.3 टक्के रिअल इस्टेटवर खर्च करत असतो. हे सगळं असलं तरीही कामाच्या परिणामात मोठी तफावत या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
सुमारे 90 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या सहकार्यांसोबत काम करण्याची सवय असल्याने कार्यालयाची आठवण येेते आहे. तसं असलं तरीही अनेक जण अनेक मार्ग अवलंबून सहकार्यांच्या सहवासात किंवा संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना आढळले.