रांची : राष्ट्रवाद या शब्दातून वेगळा अर्थ निघतो. त्याची तुलना काही प्रमाणात नाझीवाद किंवा हुकूमशाहीशी केली जाते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.
सुधारीत नागरिकत्व कायदा आणि देशव्यापी राष्ट्रीय नागरिकत्व सुची यांच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहे. हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा मुस्लीमांसाठी हानीकारक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे. रांची येथे रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात त्यांनी संघ स्वयंसेवकाने आपल्या इंग्लंड भेटीत या शब्दाची छटा समजाऊन सांगितली होती, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, आपली भाषा नसल्यामुळे आपण “नॅशनॅलिझम’ हा शब्द वापरतो. मात्र त्याचा इंग्लंडमध्ये वेगळा अर्थ काढलो जातो. राष्ट्र, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयता हे शब्द वापरणे ठिक आहे. पण राष्ट्रवाद या शब्दाचा अर्थ इंग्लंडमध्ये हिटलर, नाझीवाद किंवा हुकूमशाही या अर्थाने वापरला जातो, असे तो कार्यकर्ता म्हणाला होता, असे त्यांनी सांगितले. भागवत म्हणाले, अतिरेक आणि हवामान बदलासारख्या समस्यांमुळे जागतिक शांतता धोक्यात येत आहे. केवळ भारतीय त्याच्या संपूर्ण विचारांनी त्यावर तोडगा काढू शकतो. पर्यावरण आणि एक बरोबर आणि अन्य सर्व चुकीचे या विचारांचा अतिरेक यामुळे जागतिक शांतता धोक्यात येत आहे.
वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि अर्थ व्यवस्थेच्या पध्दती असतात. ते न स्वीकारणारे त्या देशाचे नागरिक नसतात. तुम्ही त्यांचे पाहुणे, यजमान, अल्पसंख्य अगदी शत्रूही असू शकता मात्र तुम्ही त्यांचे राष्ट्रीयत्व असू शकत नाही. संघ स्वयंसेवकांनी जात, धर्म, भाषा आणि प्रदेश असा भेद न करता जनतेशी स्वत:ला जोडून घ्यावे. भारताचे चारित्र्य हे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित आहे. आपण एकमेकांसाठी जगतो. स्वत:साठी नाही. जगाने आपल्याला बनवले आहे, आपण ते परत केले पाहीजे यावर आपला विश्वास आहे.
याबाबत एक आठवण सांगताना ते म्हणाले, एकदा एक मुस्लिम बुध्दीवादी हजला गेले होते. त्यांनी लॉकेट घातले असल्याने इश्वर निंदेच्या आरोपावरून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप केला. त्याची आठ दिवसांत सुटका केली. देशाबाबेर सारे हिंदू म्हणून ओळखले जातात, असेच जणू त्यांनी सुचवले. कारण भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्याची मुल्ये, तत्वे आणि संस्कृती त्यात प्रतिबिंबीत होत असते, असे ते म्हणाले.