उंब्रज – येथील प्रभाग 6 मधील पाटील गल्ली व अन्य काही भागांत गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची चणचण असल्याने प्रभागातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
याबाबत माहिती अशी, प्रभाग 6 मधील पाटील गल्ली व अन्य काही भागात गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी पाटील गल्ली, कोळी गल्ली, महादेव मंदिर परिसर, रोहिदासनगर येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. पाणी प्रश्नाबाबत रहिवाशांनी केलेली सूचना सत्ताधारी गांभीर्याने घेत नाहीत. मग, सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी, असा सवाल संतप्त महिला व नागरिकांनी केला.
पिण्याच्या पाण्याच्या जुनी आणि नवीन पाइपलाइन असूनही प्रभाग 6 मधील ठरावीक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घालावे. पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, असा इशारा महिलांनी दिला.
त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. अखेर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सरपंच लता कांबळे यांनी दिले. तोपर्यत टॅंकरने पाणी पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सुजाता पाटील, सुमन पाटील, लता पाटील, अश्विनी दुधाणे, सविता दुधाणे, मालन जाधव, विमल वाघमारे, चंदा वाघमारे, पुष्पा लाटे, महिला व पुरुष उपस्थित होते.