दुष्काळातील होरपळलेली गावे पाणीदार होण्यासाठी
11,000 रोख रक्कम शिंगवी यांच्याकडे केली सुपूर्द
नगर – साल 2014 पासून महाराष्ट्र राज्यातील विशेषतः विदर्भ, मराठवाडा यातील बहुतांशी गावे दुष्काळाने होरपळलेली आहेत. ही होरपळलेली गावे पाणीदार होण्यासाठी पाणी फौंडेशनने पुढाकार घेवून लोकसहभागातून चळवळ उभी केली आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून दुष्काळातील होरपळलेली गावे पाणीदार होण्यासाठी मदतीचा पहिला हात अहमदनगरमधील देह व्यापारातील बळी महिलांनी दिला आहे.
या महिलांनी आपली कमाई एकत्र करून एकूण 11000 (अकरा हजार) रोख स्नेहालय संस्थेचे पालक सुवालाल शिंगवी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी स्नेहालयाच्या विश्वस्त मीना पाठक म्हणाल्या की, या लहानश्या मदतीने दुष्काळातील होरपळलेली गावे पाणीदार होण्यास मदत होणार आहे. दि.6 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता झी मराठीवर तुफान आलया या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते आमीर खान यांनी गावे पाणीदार होण्यासाठी तसेच स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी जमा झालेली रक्कम ईश्वर चिट्टी निघालेल्या प्रत्येक गावाला रुपये एक लाख यंत्रसामुग्री (जेसीबी, पोकलंड) आदी खरेदीसाठी खर्च झालेली रक्कम दुकानदाराच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पाणी फौंडेशन आणि स्नेहालय संस्था गावे पाणीदार होण्यासाठी पुढाकार घेत आहेत तर आम्ही आपलीच गावे पाणीदार करण्यासाठी काहीच न केल्याचा अपराधी भाव आमच्या मनात त्यामुळे राहणार नाही.
आम्ही गावाच्या पाठीशी उभे असल्याचे समजल्यास त्यांचे मन परिस्थितीला तोंड देण्याचे मनोबल वाढणार आहे.जया जोगदंड यांनी सांगितले की, देह व्यापारातील महिलांनी मागील 27 वर्षापासून प्रत्येक राष्ट्रीय व नैसर्गिक आपतीत आपली एक दिवसाची किंवा दोन दिवसाची संपूर्ण कमाई आपतीग्रस्त देशबांधवांसाठी दिली आहे. त्यात 1993 सालचे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, मराठवाडा व गुजरातचा भूकंप, ओरिसातील चक्रीवादळ, त्सुनामी, विदर्भातील आत्महत्या शेतकरी, कारगिलचे युद्ध, उत्तराखंडमधील भूस्सखलन, महाराष्ट्रातील दुष्काळ, अशा विविध नैसर्गिक आपत्तीत देहव्यापारातील बळी महिलांनी सर्वप्रथम यथाशक्ती सहयोग दिला आहे. पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी किंवा विविध वृतपत्रांचे सहाय्यता निधी यातही शोषित महिलांनी सहयोग दिल्याचे संघटक रंजना रणनवरे यांनी सांगितले.