समाजाच्या शेवटच्या घटकांना न्याय्य हक्क आणि अधिकाराबरोबरच संकट काळात मदतीसाठी महिला असूनही सर्वांत पुढे असलेल्या राजगुरूनगर येथील ऍड. सौ. मनीषा संदीप पवळे-टाकळकर यांचा नावलौकिक आहे.
ऍड. सौ. मनीषा संदीप पवळे-टाकळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) येथे झाले. वर्ष 1993-94 मध्ये राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालय प्रवेश घेतल्यानंतर वर्ष 1996 मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले. तर राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वर्ष 2001 मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. वर्ष 2006 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी पुण्याच्या नामांकित आयएलएस विधी महाविद्यायात संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजगुरूनगर येथील खेड न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी खटल्याचे काम सुरू केले.
समाजातील पीडित महिला घटकासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. वकिली व्यवसायातून केवळ पैसे कमावणे, हा हेतू न ठेवता त्यांनी सामाजिक भावना ठेवून काम केले. खेड न्यायालयात दिवाणी, फौजदारी खटले हाताळल्या. ऍड. मनीषा टाकळकर यांनी केवळ 2009 मध्ये खेड बार असोसिएशनच्या निवडणुकीत सचिव म्हणून निवडणूक लढवून त्यांनी दोन वर्षे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर उपाध्यक्षा म्हणून काम केले.
न्यायालयातील विधी सेवा समितीच्या माध्यमातून त्या अनेक गावांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन करीत आहेत. ऍड. मनीषा टाकळकर यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने गेली 14 वर्षांपासून गरीब जनतेची पैशांची अपेक्षा न करता सेवा काम करीत आहेत.
महिलांना त्यांच्या हक्कासाठी योग्य चर्चात्मक मार्गदर्शन करून चर्चेतून एकमेकांतील कलह मिटविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्या खेड पोलीस ठाण्याच्या माध्यमातून महिला सुरक्षा समिती आणि भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांचे प्रश्नांवर तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करून अनेक प्रकरणांत मध्यस्थी करून महिलांना न्याय दिला आहे. सर्वसामान्य जनतेला सदैव न्याय देण्याचा त्यांचा यापुढेही प्रयत्न आहे.
“या’ धुरा प्रभावीपणे सांभाळतात
खेड तालुका महिला दक्षता आणि सुरक्षा कमिटी अध्यक्षपदासह ऍड. मनीषा टाकळकर-पवळे या हुतात्मा राजगुरू फाउंडेशनच्या अध्यक्षपदाची धुरा प्रभावीपणे सांभाळत आहेत. हुतात्मा न्यास कमिटी आणि राष्ट्रवादी लीगल सेलच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. समाजकार्याची आवड असल्याने त्यात त्यांचा कायमच उत्स्फूर्त सहभाग असतो. यासाठी त्यांना कुटुंबाचा मोठा पाठिंबा आहे.दरम्यान, शरद पवारसाहेब यांच्या विचारांनी प्रभावित असल्यामुळे व पक्षाचे निर्भीडपणे काम करीत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पदवीधर संघाच्या जिल्हा सरचिटणीसपदी ऍड. मनीषा टाकळकर-पवळे यांची नेमणूक केली आहे.
मनोरुग्ण, निराधारांचा आधार
हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या त्या 24 ऑगस्ट 2018 पासून संचालक आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून मनोरुग्ण आणि गरीबांसाठी काम करीत आहेत. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करून अनेक निराधारांना आधार देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत “उडान फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शब्दांकन
रामचंद्र सोनवणे,
खेड तालुका प्रतिनिधी