“इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी विश्वासराव रणसिंग यांनी शिक्षण क्षेत्रात अप्रतिम ठसा उमटविला आहे. माहेर आणि सासरकडील प्रतिष्ठित कुटुंबाचा वारसा त्यांना लाभला आहे. “शिक्षणाला तरणोपाय नाही, शिक्षण हाच उत्कर्षांचा पाया’ ही दूरदृष्टी ठेवूनच विश्वासराव रणसिंग यांनी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली होती. ग्रामविकासाचा पाया हाच शिक्षणात दडला आहे, हे ओळखून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.
त्यांच्या पश्चात आनंदीकाकी रणसिंग यांनी प्रतिष्ठानची धुरा लीलया पेलली. आज आनंदीकाकी आणि पुत्र वीरसिंह रणसिंग यांनी परिसरात व्यावसायभिमुख शिक्षणाला नवा आयाम दिला आहे. श्रीमती आनंदीकाकी रणसिंग यांनी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या आधारवड बनल्या आहेत. त्यांचे कार्य इंदापूरसह जिल्ह्याला दीपस्तंभासारखे आहे. “महिला दिना’निमित्त त्यांच्या वाटचालीचा घेतलेला खास मागोवा…
भारताचा इतिहास फारच गौरवशाली आहे. प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे कुटुंबातील महिलाची खंबीर साथ असते. पुरूषाप्रमाणे महिलांनीही दैदिप्यमान कामगिरी बजावलेली आहे. इंदापूर तालुक्यातील अशीच एक कर्तबगार स्त्री म्हणजे श्रीमती आनंदी विश्वासराव रणसिंग. परिसरात त्या “काकी’ म्हणून या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या मूळच्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावच्या. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव यशवंतराव नाईक-निंबाळकर होते. नाईक-निंबाळकर हे प्रतिष्ठीत व नावाजलेले घराणे आहे.
अशा प्रतिष्ठीत घराण्यातील मुलीचा विवाहही प्रतिष्ठीत घराण्यातच व्हायला हवा होता आणि तो योगही जुळून आला. रविवार दि.6 जुलै 1975 रोजी विश्वासराव आणि आनंदी यांचा विवाह निमसाखर येथे त्यांचा मोठ्या थाटात पार पडला. हा विवाह जमविण्यामध्ये अकलूजचे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला होता. ते स्वत: या विवाहाला उपस्थित होते. इतकी आत्मीयता मोहिते-पाटील आणि निंबाळकर तसेच रणसिंग घराण्यात ओतप्रोत भरली आहे. विश्वासदादा व आनंदीकाकी या दांपत्यांना 1978 मध्ये वीरसिंह व 1979 मध्ये वीरबाला अशी दोन अपत्ये झाली.
राजकारणाचा वारसा विश्वासदादांना आपल्या वडिलांकडून मिळाला होता. विद्यार्थी दशेमधुनच त्यांचे हे गुण प्रकर्षाने दिसत होते. ते वर्ष 1970-71 मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी होते. कृषी पदवीधर झाल्यानंतर त्यांना लगेच नोकरीही लागली. पण त्यांनी ती सोडून समाजसेवेचा मार्ग पत्करला. समाजसेवेचा मार्ग अतिशय खडतर असतो. पण या खडतर मार्गावरून चालताना आनंदीकाकींनी आपल्या पतीला खंबीर आणि तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
विश्वासराव रणसिंग यांनी अतिशय तळमळीने समाजासाठी कार्य केले. त्यांच्या सर्व कार्यात त्यांच्या पाठीशी त्यांच्या सहचारिणी, त्यांची पत्नी श्रीमती आनंदीकाकी रणसिंग खंबीरपणे उभ्या राहिल्या. विश्वासदादांची मोठी स्वप्ने होती. म्हसोबाचीवाडी येथे फार्मसी, इंजिनिअरींग कॉलेज स्थापन करणे, जलव्यवस्थापन व जलसाक्षरता राबविणे, संगणक साक्षरता, अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर, सेंद्रिय शेती, हरितगृहाविषयी शास्त्रोक्त माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, निमसाखर येथे भव्य हॉस्पिटल उभारणे, तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न, गावोगावी सार्वजनिक वाचनालये उघडण्यास स्थानिक लोकांना प्रोत्साहन, आदी व्हिजन त्यांनी बाळगले होते.
पण दि. 2 मे 2013 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनपश्चात प्रतिष्ठानच्या इतर पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमती आनंदीकाकींवर सोपविली. आजही जबाबदारी त्या खंबीर व यशस्वी पार पाडीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांना प्रतिष्ठानच्या इतर पदाधिकाऱ्यांचे व संपूर्ण रणसिंग कुटुंबीयांचे सहकार्य मिळत आहे.
स्व. विश्वासदादांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची फार मोठी जबाबदारी अध्यक्ष या नात्याने श्रीमती आनंदीकाकींवर पडली. त्यांनी ती समर्थपणे पारही पाडली. कळंबचे महाविद्यालय 2015 पासून स्वत:च्या जागेत भरत आहे. कळंब गावालगतच विस्तीर्ण जागेवर महाविद्यालयाची भव्य व प्रशस्त अशी इमारत उभी राहिली आहे.महाविद्यालय परिसरात योग्य ठिकाणी वृक्षारोपण केल्याने इमारतीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. महाविद्यालयासमोरून बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर रस्ता गेल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्यांना महाविद्यालयाची इमारत आकर्षित केल्याशिवाय रहात नाही.
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आलेअसून संबंधित दर्जेदार पुस्तके उपलब्ध केली आहेत. महाविद्यालयाचे ग्रंथालय सुसज्ज असून ते अत्याधुनिक बनविण्यात आले आहे. महाविद्यालयातील विविध कार्यक्रमासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, दृक-श्राव्य सिस्टीमसह स्वतंत्र सेमिनार हॉल आहे. अद्यापही इमारतीचे बांधकाम सुरू आहे. महाविद्यालयासमोर भव्य क्रीडांगण असून पार्कींगची विस्तृत सुविधा आहे. संपूर्ण महाविद्यालयाला मजबूत कंपाऊंड आहे. प्रशस्त प्रवेशद्वार आणि प्रवेशदारावर वॉचमन असून सुरक्षेसाठी तो बारकाईने लक्ष ठेवतो. महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आनंदीकाकींनी पतीच्या मृत्यूपश्चात प्रतिष्ठानची फार मोठी जबाबदारी अध्यक्ष या नात्याने पेलली आहे. खऱ्या अर्थाने त्या प्रतिष्ठानच्या आधारवड आहेत. दीपस्तंभ आहेत. अशा या कर्तृत्ववान आनंदी काकींना मानाचा सलाम.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना
इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विश्वासदादांनी “इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान’चा स्थापना केली. या प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. या प्रतिष्ठानमार्फत कळंब येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची तसेच म्हसोबाचीवाडी व तावशी येथे माध्यमिक विद्यालयांची स्थापना केली. विश्वासदादा हे सलग 10 वर्षे इंदापूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती व 4.5 वर्षे सभापती होते. सलग 17 वर्षे ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या काळात तालुक्यातील सर्वच स्तरातील लोकांचा त्यांचा जवळून संपर्क आला. राजकारणाचा परीघ त्यांनी व्यापून टाकला होता.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सुसज्ज सुविधा
महाविद्यालयात 2015 मध्ये वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर वर्ग सुरू झाले. एवढेच नव्हे तर विज्ञान शाखाही सुरू झाली. दादांच्या कार्याची स्मृती म्हणून महाविद्यालयाचे नामकरण “विश्वासराव रणसिंग महाविद्यालय’ असे करण्यात आले. महाविद्यालयात कॉम्प्युटरची मोठी लॅब उभारली असून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. इंटरनेटची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग संदर्भ शोधण्यासाठी त्याचा उपयोग करतात. याशिवाय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या मार्गदशनासाठी विशेष कक्ष निर्माण केला आहे.
– शब्दांकन
प्रा. डॉ. हमीद काझी, डॉ. विजय केसकर