पुणे – महिलांची टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धा पार पडली. यंदाच्या स्पर्धेत सुपरनोव्हाजने वेलॉसिटीचा पराभव करत तिसरे विजेतेपद पटकावले व देशातील आजी-माजी महिला क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही आता परिपूर्ण आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली आहे.
यंदाची चॅलेंज स्पर्धा पाहिली तर भारतीय महिला क्रिकेटपटूंसह विविध देशांतील खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने या स्पर्धेच्या लोकप्रियतेत वाढ केली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जेव्हा पद स्वीकारले तेव्हा महिलांच्या परिपूर्ण आयपीएलचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला जवळपास तीन वर्षे झाल्यानंतरही अद्याप केवळ तीन संघांतच चॅलेंज स्पर्धा खेळवली जाते.
केवळ चार सामन्यांची ही स्पर्धा महिलांच्या क्रिकेटमध्ये काय व किती प्रमाणात प्रगती साधणार, असा सवाल करत देश-विदेशातील अनेक दिग्गज खेळाडू व चाहत्यांनी महिलांची परिपूर्ण स्पर्धा खेळवावी, असा आग्रह धरला आहे.