चंद्रपुर : महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता शक्ती कायदा लवकरच लागू करण्यात येणार आहे. मात्र महिलादेखील दहा ते वीस वर्षानंतर हेतूपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी करतात. यातील बहुसंख्य तक्रारी या खोट्या असतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
देशमुख म्हणाले की, “शक्ती कायद्यासंदर्भात लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सूचना प्राप्त झालेल्या असून लवकरच हा कायदा लागू होणार आहे. महिला अत्याचाराच्या घटना अधिक असल्या तरी महिलादेखील दहा ते बारा वर्षापूर्वीच्या घटनांचा संदर्भ देत पुरूषांविरोधात तक्रारी करतात. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करतात, अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करतात. अशा महिलांवरही कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात आहे. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
“अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ला व इतर घटनांची माहिती तीन ते चार दिवसांपूर्वीच मिळते/ समाजमाध्यमांमध्ये आता या सर्व गोष्टी सार्वजनिक झालेल्या आहेत. या सर्वाला केंद्र सरकार जबाबदार आहे. अर्णबच्या चौकशीत आणखी बरीच माहिती समोर येईल. लवकरच पोलीस भरतीची पक्रिया सुरू केली जाणार आहे. ही पोलीस भरती नियमानुसार होणार आहे, असंही देशमुख म्हणाले.