डॉ. रामकली पावसकर; साताऱ्यात स्त्रीमुक्ती परिषद उत्साहात
सातारा (प्रतिनिधी) – आजचे सामाजिक वास्तव भीषण असून त्याला छेद देण्यासाठी स्त्रियांनी जागरूक राडिले पाहिजे. म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या महामानवांचे विचार उपयुक्त असल्याचे मत ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्यावतीने मनुस्मृती दहनदिनी सातारा येथील पाठक वेदभवनात झालेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत त्या बोलत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत खंडाईत, उपाध्यक्ष स्वप्ना निकाळजे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. रेखा कांबळे उपस्थित होत्या.
डॉ. पावसकर म्हणाल्या, आजही स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांवर मात करण्यासाठी स्त्रियांनी संघटित होणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व हक्कांचा सदुपयोग करावा. स्त्री-पुरुष समानता महत्त्वाची आहे. खंडाईत म्हणाले, बहुजन समाजातील महिला आता समाजात मुक्तपणे वावरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून केलेल्या विरोधाचेच हे फलित आहे. मात्र, प्रतिगामी विचार पुन्हा डोके वर काडून मनुस्मृतीचे समर्थन करत आहेत. त्याला महिलांनी कडाडून विरोध करण्याची गरज आहे.
दि. 25 डिसेंबर हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन जाहीर करावा, हैद्राबाद येथील बेकायदेशीर एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी करावी, स्त्रियांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, आरएसएस, भाजप सरकारने आणलेल्या एनआरसीचा तीव्र निषेध करावा, पायाभूत राष्ट्रीय उद्योगातील गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय सरकारने रद्द करावा, संविधानाचे उल्लंघन करणारा नागरिकत्व सुधारणा कायदा सरकारने मागे घ्यावा, भीमा-कोरेगाव हल्ल्यातील निष्पाप कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, असे ठराव संमत करण्यात आले. संगीता लोकरे, सुजाता माने, शारदा कांबळे, द्राक्षा खंडकर, संगीता जगताप, आशा गायकवाड, रेश्मा काळे, शांता जावळे, कुसूम सोनावणे, अरुणा नांगरे, श्रद्धा भालेकर, मनीषा कवटेकर, सविता शीलवंत, छाया गायकवाड, सुनंदा निकाळजे, सावित्री भोसले, अलका निकाळजे उपस्थित होत्या. ऐश्वर्या उघडे यांनी आभार मानले.