श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – घरात झालेल्या भांडणातून स्वतःला पेटवून घेणार्या टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) येथील आदिवासी समाजातील महिलेचा अखेर मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनिका पवार (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) असे या मयत महिलेचे नाव आहे. 1 जाने. 2021 रोजी पवार यांच्या कुटुंबात मोठे भांडण झाले. यामध्ये राग अनावर झाल्याने मोनिका पवार यांनी गावातीलच एक किराणा दुकान गाठले. तेथून बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन ते अंगावर ओतून घेतले. आगपेटीच्या साह्याने तिने स्वतःस पेटून घेतले. उपस्थितांनी आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केला.
मात्र त्यात यश आले नाही. मोनिका यांना तत्काळ श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर 10 जाने. 2021 पर्यंत उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी भाजलेल्या वेदना असह्य होऊ लागल्याने त्यांना दवाखान्यात आणण्यात आले. मोनिका पवार यांची बिघडलेली प्रकृती पाहता त्यांना तातडीने नगरला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र नातेवाईकांच्या गोंधळात उशिर झाल्याने त्यांची प्राणजोत 21 जाने. 2021 रोजी रुग्णालयात मालवली.
दरम्यानच्या काळात 2 जाने. रोजी मोनिका पवार यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये त्यांनी पेटून घेतलेल्या घटनेस कुटुंबातील सदस्य दोषी असल्याचे म्हटले होते. त्यानुसार 2 जाने. रोजीच सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने श्रीगोंदा पोलिसांनी यामध्ये वाढीव कलम लावत त्याच सहा जणांवर भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहेत.