कोल्हापूर – कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटला. केवळ अडीच तासांत या तलावातील पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. मेघोली तलाव मधील पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पुर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या परिसरात ढगफुटी सारखे दृश्य झाले आहे.
१९९६ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ दलघफू पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रूपये खर्च झाले. सुरूवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती.मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्या मुळे हा प्रकल्प फुटलाय.हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन नवले गावातील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर काहीजणांना बचावण्यात यश आले आहे. दरम्यान, या फुटलेल्या तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय काही रस्ते सुद्धा वाहून गेले असून आजूबाजूच्या काही गावाचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अनेक लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत आणि त्यातील काही प्रकल्पांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे अशीच घटना कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा घडू शकते त्यासाठी जलसंपदा विभागाने अशा प्रकल्पांच्या कडे विशेष लक्ष देण्याची गरज अन्यथा आम्हला आंदोलन करावं लागेल असा इशारा अधिकार कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी सांगितल आहे
मेघोली तलाव फुटून पाण्याच्या प्रवाहाने पुढच्या अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः वाहून गेली असून त्याठिकाणी मोठं मोठे दगड वाहून आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे ओढ्यालगत असलेली वाहने तसेच काहींच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचे समोर आले आहे. काहींचे तर पॉवर ट्रिलर सुद्धा वाहून गेले आहेत. अचानक तलाव फुटल्याने पाण्याच्या मोठा लोंड्यामुळे मेघोली, सोनूर्ली, नवले, वेंगुरूळ, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या लघु प्रकल्पाच्या परिसराची पाहणी केली असून पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटल्याने शेतीचे अपरिमित नुकसान झाला आहे. मात्र जिल्ह्यातील इतर प्रकल्प यांच्या भक्कम आणि सुस्थिती बाबत प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने इतर सर्व लघुपाटबंधारे विभागाचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झालीय.