कोल्हापूर (प्रतिनिधी) – करवीर तालुक्यातील वडणगे येथील महिलेने दोन लहान मुलीसह पंचगंगा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. सुनेत्रा संतोष सावळकर (वय 30), श्रीशा संतोष सावळकर (10), खुशी संतोष सावळकर (6) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पंचगंगा नदीत सायंकाळी मातेसह दोन मुलींचे मृतदेह आढळून आले. सुनेत्रा हिचे पती संतोष हे बांधकाम व्यावसायिक होते. पाच वर्षांपूर्वी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीय हतबल झाले होते. सुनेत्रा सासू-सासरे आणि दोन मुलींसह येथे राहत होत्या. सांगलीतील एका फर्ममध्ये सुनेत्रा नोकरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होत्या.
काल शनिवारी सकाळी दहा वाजता कामावर जाते, असे सांगून सुनेत्रा दोन मुलींसह घरातून बाहेर पडली. सायंकाळी सात वाजेपर्यंत मुलीसह सुनेत्रा घराकडे न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. आज रविवारी सकाळीही सर्वत्र शोध सुरु होता. मात्र त्यांचा सुगावा लागला नव्हता.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.
दरम्यान, आज दुपारी चार वाजता पंचगंगा घाटावर दोन मुलींसह महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना आढळून आला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण पोलीस शोधत आहेत.