राजकोट – वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या व अत्यंत चाणाक्ष नेतृत्वाच्या सौराष्ट्र संघाने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिले वहिले विजेतेपद साकार केले. शुक्रवारी संपलेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावातील 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने विजेतेपद मिळविले.
विशेष म्हणजे सौराष्ट्राच्या संघाने कोणीही स्टार प्लेअर संघात नसताना हा विजय साकारला. याबाबत नीरज ओडेन्द्र हे सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘रणजी करंडक स्पर्धेच्या मागील दोन्ही सिझनमध्ये सौराष्ट्रचा संघ अत्यंत चांगली कामगिरी करत होता, हे सर्वांनीच पाहिले आहे. मात्र, सातत्याने हा संघ स्टार प्लेअर्सवर अवलंबून असायचा. यावर्षी पुजाराव्यतिरिक्त कोणीही स्टार प्लेअर नसताना, आहे त्या संघातीलच आत्मविश्वासाला खतपाणी घालणे गरजेचे होते’.
ते ओळखूनच मी उनाडकटसह सर्वांना विश्वासात घेऊन सांगितले होते की, ‘आता यावर्षी तुम्हाला विजेते बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नंतर चमत्कार कसा आणि काय झाला, ते सर्वांनीच अनुभवले आहे. कर्णधार जयदेव उनाडकटलाच या विजेतेपदाचे सर्व श्रेय असून ते त्याच्याकडून हिरावले जाता कामा नये’.