लंडन – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील दोघा क्रिकेटपटूंना करोनाची बाधा झाल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच करोनाच्या नियमांची पायमल्ली करू नये, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचना भारतीय संघ व्यवस्थापन तसेच खेळाडूंपर्यंत पोहोचेपर्यंत दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने बीसीसीआयची सूचना म्हणजे बैल गेला अन् झोपा केला अशीच असल्याचे सिद्ध होत आहे.
यष्टीरक्षक ऋषभ पंत, वृद्धिमान साहा या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील अन्य तीन सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयचे डोळे उघडले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला पत्र लिहून करोनासंदर्भात काळजी घेण्यास सांगितले होते. पण जोपर्यंत हा निरोप संघ व्यवस्थापनापर्यंत पोहोचला तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
शहा यांनी भारतीय खेळाडूंना इंग्लंडमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळण्यास सांगितले होते. त्याचबरोबर युरो करंडक फुटबॉल स्पर्धेचे तसेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे म्हटले होते. जोपर्यंत शहा यांनी भारतीय संघाला सूचित केले तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण इंग्लंडमधील सर्व स्पर्धा संपल्या होत्या.
जेव्हापासून भारतीय खेळाडूंना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत तेव्हापासून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. त्यापैकी एकाही खेळाडूने मास्क घातलेला दिसत नाही. ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, प्रशिक्षक रवी शास्त्री हे गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता उपस्थित असल्याचे दिसले होते. याशिवाय रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी फिरत होते.
इंग्लंडच्या तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला करोना झाल्यानंतर देखील बीसीसीआयला जाग आली नाही. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या सुट्ट्या रद्द केल्या नाहीत. आता भारतीय संघ लंडनमध्ये एकत्र येत आहे आणि पुढील पाच दिवसांत त्यांना सराव सामना खेळायचा आहे.
अशात आणखी काही खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर बीसीसीआय आणि भारतीय संघासमोर मोठे संकट उभे राहणार आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना करोना झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना कोणताही धोका नसल्याचे म्हटले होते. भारताच्या 23 खेळाडूंना डरहॅम येथे सराव सामना खेळायचा होता. आता या संघासोबत करोना झालेल्या दोघा खेळाडूंना जाता येणार नाही.
इंग्लंडमध्ये सध्या करोनाचा डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. ज्या दोन भारतीय खेळाडूंना करोना झाला आहे त्यांना डेल्टा व्हेरिएंटची लागण असल्याचे समजते. हा करोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट असल्याचे समजते.
गांगुलीने केली पाठराखण
भारतीय संघातील ऋषभ पंतसह जे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य युरो करंडक व विम्बल्डन स्पर्धेला उपस्थित होते व त्यांनी मास्कही वापरले नव्हते त्यांची पाठराखण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. बायोबबलमधून खेळाडू बाहेर गेले तेव्हा त्यांची सुट्टी सुरू होती. ते विविध ठीकाणी एक पर्यटक म्हणून जात होते आणि त्या प्रत्येक वेळी मास्कचा वापर करणे शक्य होत नाही याची मलाही पूर्ण कल्पना आहे, अशा शब्दांत गांगुली यांनी खेळाडूंची रद्दबदली केली आहे.