ग्रामपंचायतीने केली होती लेखी तक्रार; बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार उघड
जवळा – आठ महिन्यांपुर्वी जामखेड-करमाळा मार्गावरील चार पुलांचे काम करण्यात आले होते. या पुलांच्या कामाच्या संरक्षण भिंतीचे सिमेंट कॉंक्रीट निखळून पडल्याने त्यातील लोखंडी गज उघडे पडले आहेत. तसेच त्या भिंतीला आताच भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे हे काम चालू असताना ग्रामपंचायतने या कामबद्दल लेखी तक्रार केली होती. या चार पुलांचे काम करण्यासाठी 2 कोटी 20 लाखांच्या निधी वापरण्यात आला होता.
हे काम चालू असताना निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड यांना जवळा ग्राम पंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी दिले होते. तरीही या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले.
या पुलाबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई का केली नाही तसेच कामाकडे लक्ष का दिले नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारकडून सदर बांधकामावर झालेला खर्च वसूल करण्यात यावा. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जवळा ग्रामस्थ करत आहेत.