मुंबई : महाराष्ट्रात चालू महिन्यात (एप्रिल) करोना वेगाने फैलावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण अवघ्या 8 दिवसांत आढळले आहेत.
महाराष्ट्रातील पहिल्या 3 करोनाबाधितांची नोंद 9 मार्च यादिवशी झाली. त्यानंतर महिनाभरात (8 एप्रिलपर्यंत) ती संख्या 1 हजार 135 इतकी झाली. राज्यात 31 मार्चपर्यंत 220 करोनाबाधित आढळले होते.
पुढील 8 दिवसांत ती संख्या 915 ने वाढली. राज्यातील करोनाबाधितांनी 23 मार्चला 100 हा आकडा ओलांडला. त्यानंतर बाधितांच्या संख्येत दरदिवशी दोन आकडी भर पडू लागली. आता मागील 5 दिवसांत राज्यातील रूग्ण 100 हून अधिक संख्येने वाढत आहेत. चालू महिन्यात करोनाने घेतलेल्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. राज्यात 17 मार्चला करोनाने पहिला बळी घेतला.
त्यानंतर करोनाबळींची संख्या वाढून 8 एप्रिलला 72 इतकी झाली. त्यातील 62 जणांचा मृत्यू केवळ 8 दिवसांत झाला. बाधित आणि मृतांची वाढती आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे. त्यातून लॉकडाऊनची आणि इतर निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सरसावल्या आहेत. देशातील सर्वांधिक करोनाबाधित आणि मृतांचे प्रमाण महाराष्ट्रात आहे.