जामखेड – जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेसोबत आपण असून, या विषयासाठी तुमच्यासोबत असल्याची भावना आ. रोहित पवार यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करावे, या संदर्भात नामांतर कृती समितीतर्फे जनजागृती करण्यासाठी 12 दिवसांच्या जिल्हास्तरीय रथयात्रेचा प्रारंभ अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चोंडी येथे झाला. या वेळी आ. पवार बोलत होते. या वेळी रथयात्रेचे उद्घाटन श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडीचे (जि. कोल्हापूर) मुख्य मानकरी व भाकणूककार खेलोबा राजाभाऊ वाघमोडे ऊर्फ फरांदे महाराज यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोटे – देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी नामांतर कृती समितीचे विजय तमनर, चोंडीचे अक्षय शिंदे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे, अविनाश शिंदे, सचिन डफळ, निशांत दातीर, राजेंद्र तागड, अक्षय भांड, दत्तात्रय खेडेकर, अशोक होनमाने, विनोद पाचरणे, संदीप भांड उपस्थित होते. या वेळी आ. पवार म्हणाले, की जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी कोणा एकाची नसून, सर्वजण अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. अहिल्याबाईंइतकी कार्यकुशलता असलेले व्यक्तिमत्त्व नाही. पुढील काळात ही मागणी विधान परिषदेत आली, तर नक्कीच सहभागी होणार आहे. तसेच चोंडी येथील विकासकामांना प्राधान्य देत 9 कोटींची नव्याने कामे करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तमनर यांनी, आगामी अधिवेशनादरम्यान हा मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे सांगितले.
…तर जयंती कार्यक्रम नाही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमापूर्वी नामांतर झाले नाही. तर जयंती कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा कृती समितीतर्फे देण्यात आला.