सातारा – गेली पाच वर्षे टक्केवारी, कमिशन, टेंडर, घंटागाड्यांचे हप्ते असे कार्यक्रम राबवून सत्ताधाऱ्यांनी पालिकेची अक्षरशः लूट केली. तीन-चार महिन्यांपूर्वी पालिकेची निवडणूक लागणार, असे दिसताच त्यांनी शहरात नारळ फोडण्याचा धडाका लावला; पण निवडणूक पुढे ढकलली जाताच सत्ताधारी आघाडीचे नेते गायब झाले. आता पुन्हा निवडणुकीची चाहुल लागताच साताऱ्यातील नारळफोड्या गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पालिकेचे कामकाज चालते का, असा खोचक सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. त्याचबरोबर सूज्ञ सातारकर निरोपाचा “नारळ’ देऊन या गॅंगला घरी बसवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे की, गेल्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून आणि सातारकरांना भावनिक करून सातारा विकास आघाडीने पालिकेत सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा करणाऱ्यांनीच पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले. आता निवडणूक कार्यक्रम सुरू होताच त्यांना नागरिकांचा पुळका आला आहे. शहरात व हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात नारळ फोडण्याचा सपाटा त्यांनी राजकीय स्वार्थासाठी लावला. काम न करता नुसती हवा करण्यामुळे त्यांचे “नारळफोड्या गॅंग’ असे नामकरण नागरिकांनीच केले आहे.
स्वार्थी सत्ताधाऱ्यांची कमाल म्हणजे निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्याचे जाहीर होताच, ते गायब झाले आणि आता निवडणूक घेण्याचे जाहीर होताच, ते पुन्हा हजर झाले आहेत. यात आश्चर्यकारक काहीच नाही. सातारकरांना त्यांची खोड कळून चुकली आहे. निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्याने बैठका घेणे आणि न होणाऱ्या विकासकामांचा भडीमार करणे, हा उद्योग सुरू झाला आहे. पालिकेचा कारभार प्रशासन, मुख्याधिकारी चालवतात की, निवडणूक आयोग चालवतोय, हेच कळायला मार्ग नाही.
कास धरण प्रकल्पामुळे पाचपट पाणीसाठा होणार असला, तरी त्याचा फायदा सातारकरांना होणार नाही. पाणीसाठवण क्षमतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकल्या असत्या, तरच नागरिकांना मुबलक पाणी मिळाले असते; पण सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणा सातारकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साविआच्या नेत्यांनी नुकतीच बैठक घेऊन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय घेतला. ठेकेदारांना मालामाल आणि पैशाची उधळपट्टी करण्याचे हे धोरण आहे. नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना सक्रिय होण्याचा सल्ला दिला. म्हणजे गेली पाच वर्षे सत्ताधारी झोपले होते, याची कबुलीच त्यांनी दिली आहे.