श्रीकांत कात्रे
ग्रामीण भागात एखादा व्यवसाय करत प्रपंचाला आर्थिक स्थिरता मिळवून देणे सोपे नसते. पण आपल्या प्रपंचाला हातभार लागला पाहिजे या जाणीवेतून सुरैय्या शेख यांनी फळांचा आणि चप्पल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कष्टाने वाटचाल सुरू ठेवत व्यवसायात जम बसविला. लॉकडाऊन काळातील संकटांने परिसीमा गाठली. मात्र, हताश न होता त्या संघर्ष करत राहिल्या. आता व्यवसायातून वेळ मिळणेही त्यांना दुरापास्त झाले आहे, इतक्या त्या गुंतून गेल्या आहेत. आर्थिक स्वावलंबनाबरोबरच कुटुंबाच्या प्रगतीलाही त्यांनी दिशा दिली.
महागाईमुळे सर्वच हैराण आहेत. एकट्याच्या कमाईवर कुटुंबाचे गरजेचे खर्चही भागत नाहीत, याची जाणीव कुटुंबातील महिलेला असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही जणींची धडपड असते. सर्वांनाच मार्ग सापडतो असे नाही. जिद्दीने आणि चिकाटीने परिस्थितीशी झगडत पर्याय मिळविण्यात काही जणींना यश मिळते.
दहिवडी येथील सुरैय्या शेख त्यापैकीच. परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी संघर्ष केला. जिद्दीने त्या व्यवसायात स्थिरस्थावर झाल्या. मात्र, त्यामागे त्यांची चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारीच महत्त्वाची ठरली. पतीचा फळविक्रीचा व्यवसाय. दोन मुले. महागाईमुळे प्रपंचाचा गाडा ओढणे कठीण झाले होते, त्यामुळे आपणच काही तरी हातपाय हलविले पाहिजेत, असे त्यांना वाटले. एखादा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावावा असे त्यांनी ठरविले. व्यवसाय करायचा पण तो कोणता असा प्रश्न समोर उभा राहिला. अखेर चप्पल विक्री करण्याचे त्यांनी निश्चित केले.
त्यासाठी ना दुकान ना गाळा. फळांच्या विक्रीसाठी नगरपंचायतीचा स्टॉल होता. त्याच्याशेजारी फलटण चौकात रस्त्यावरच त्यांनी चप्पल विक्री सुरू केली. पुणे आणि कराडला जायचे तेथून चप्पल खरेदी करायच्या आणि दहिवडी येथे येऊन त्याची विक्री करायची असा दिनक्रम सुरू झाला. सोबतीला फळांची विक्री होतीच. त्याशिवाय काही सीझनल वस्तूंची विक्रीही त्यांनी सुरू केली. रस्त्यावर विक्री करणाऱ्या महिलांना मदतीची भूमिका माणदेशी फाउंडेशन नेहमीच घेत आले आहे. या फाउंडेशनच्या प्रतिनिधींची भेट सुरैय्या यांच्याशी झाली. त्यावेळी फाउंडेशनकडून बिनव्याजी पाच हजार रुपयांचे कर्ज त्यांना मिळाले.
त्या भांडवलातून व्यवसायाला बळ मिळाले. या कर्जाची परतफेडही त्यांनी केली. त्यामुळे काही महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पाच हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळाले. व्यवसायाला आर्थिक मदत मिळण्याबरोबरच व्यवसायवृद्धीसाठी माणदेशी फाउंडेशनकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. फाउंडेशनकडून दोन तीन वेळा व्यवसायवृद्धीसाठी काही प्रशिक्षणही मिळाले. त्यातून व्यवसाय वाढत गेला. सारे सुरळीत चालले होते. आता सारे ठीक होईल, असे वाटत असतानाच करोनाचे संकट उभे ठाकले. हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी हा काळ मोठा संघर्षाचा होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला.
काही दिवसांनंतर खाण्याचे वांदे सुरू झाले. पोटाची भूक मोठी असते, त्यातून धडपड करण्याची उर्मी मिळते. लोकांना खायलाच
मिळत नाही, अशा स्थितीत खाण्याच्या वस्तू विकून आपण आपली गुजराण करू शकतो, असा विचार सुरैय्या यांच्या मनात आला. त्यावेळी त्यांनी एकाकडून 265 रुपयांना काही कलिंगडे विकत घेतली. दहिवडीतील बिदाल रस्त्यावर छोट्या मुलासह बसून विक्री सुरू केली. त्यातून नफा मिळत गेला. मग दहिवडीजवळील बागांमधून कलिंगडे मिळवून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली. चांगला प्रतिसाद मिळत गेल्यामुळे आता जगण्याच्या आशा वाढत गेल्या. संकटाशी नेटाने लढण्याचे बळ मिळत गेले. पुन्हा आर्थिक स्थिरतेची वाट सापडली. फळ विक्रीच्या नफ्यातून दहिवडीसारख्या तालुक्याच्या गावात दोन गुंठे जागा घेतली. घराचे स्वप्न पूर्ण झाले. आता फळ विक्रीबरोबरच चप्पलची विक्री सुरू झाली.
दिवाळी, संक्रांत किंवा इतर सणांच्या निमित्ताने बांगड्यांची विक्री तसेच हंगामी वस्तूंची विक्री सुरू झाली. चप्पल व्यवसायात ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी दीडशे रुपयांत कोणतीही चप्पल अशी योजना सुरू केली. दोन्ही मुलांना बारावीपर्यंत शिक्षण दिले. पण त्यांनाही व्यवसायाचीच गोडी लागली. व्यवसायातून तेही कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. आता सारे स्थिरस्थावर होत आहे. अर्थातच त्यामागे सुरैय्या यांचे कष्ट आहेत. रोज सकाळी घरकाम उरकून त्या आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी येतात.
सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सातपर्यंत ग्राहकांशी संवाद साधून चप्पल फळांसह विविध वस्तूंची विक्री करत असतात.दिवाळी, संक्रांत अशा सणांच्यावेळी तसेचकाही हंगामी वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांना फोनवरून आर्डर मिळते. त्या मागणीनुसार त्या वस्तूंचा पुरवठाही करतात. या साऱ्या व्यापात दिवस कसा संपतो, हेही त्यांच्या लक्षात येत नाही, एवढेच नव्हे तर या व्यापातून त्यांना इतरांशी बोलण्यासाठीही वेळ देता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
माहेर बारामती पन्नास किलोमीटरवर, लोणंद सासर. पण दहिवडीतून दोन्ही ठिकाणी जायचे म्हटले तर त्या व्यवसायांच्या व्यापातून वेळच काढू शकत नाहीत. आवडीने आणि कल्पकतेने त्यांनी व्यवसायात यश मिळविले आहे. ग्रामीण भागात आपल्या कुटुंबासाठी सारासार विचार करून संघर्ष करीत त्यांनी जगण्यात स्थिरता मिळवली. त्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची तमा त्यांनी केली नाही. एकदा ध्येय निश्चित केले की त्या मार्गावरून जाताना येणारे अडथळे दूर करण्याची ताकदही मिळत जाते, यामुळे प्रत्येक परिस्थितीशी झगडत सुरैय्या यांनी केलेला प्रवास इतरांसाठी ही अनुकरणीयअसाच आहे.