सिऍटल, दि. 29- बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 2021 सालासाठीचे वार्षिक पत्र आज शेअर केले, द इयर ग्लोबल हेल्थ वेण्ट लोकल (जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष) असे पत्राचे शीर्षक आहे. या वर्षीच्या पत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी कोविड-19 साथीचा जगभरात झालेला परिणाम आणि सामाजिक आरोग्यासाठी झालेल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या प्रयत्नांमधील जागतिक समन्वय आणि वैज्ञानिक नावीन्यपूर्णता यावर प्रकाश टाकला आहे. जग या साथीतून अधिक कणखर, अधिक निरोगी होऊन बाहेर पडेल याबद्दल आपण आशावादी का आहोत हे त्यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे.
कोविड-19 आजाराने अनेकांचे प्राण घेतले, लक्षावधींना आजारी केले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला एका विनाशकारी मंदीच्या गर्तेत ढकलले. बिल आणि मेलिंडा याबाबत म्हणतात की, महामारीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी अद्याप आपल्याला दीर्घ प्रवास करणे आवश्यक असले, तरी नवीन चाचण्या, उपचारपद्धती व लशींच्या स्वरूपात जगाने काही लक्षणीय विजय साध्य केले आहेत. या नवीन साधनांनी लवकरच समस्यांचे निराकरण होऊ लागेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.
साथीवर मात करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जगभरातील उदार व्यक्तींनी संसाधनांच्या स्वरूपात देणग्या दिल्या, प्रतिस्पर्ध्यांनी संशोधनातील निष्कर्षांचे आदानप्रदान केले आणि अनेक वर्षांच्या जागतिक गुंतवणुकीने विक्रमी वेळात लशीचा विकास, सुरक्षित डिलिव्हरी व प्रभावी लस यांचे नवीन विश्व खुले केले, असे बिल आणि मेलिंडा यांचे म्हणणे आहे. मात्र, त्याचबरोबर साथीमुळे आरोग्यक्षेत्रातील अनेक असमानता तीव्र झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विशिष्ट वर्णाचे समुदाय, गरीब आणि स्त्रिया यांना दिली जाणारी असामनतेची वर्तणूक विशेषत्वाने दिसून आली आहे, असा इशारा त्यांनी दिला. या साथीमुळे रोगप्रतिकारशक्तीतील असमानता हा अन्यायाचा एक नवीन प्रकार कायमस्वरूपी प्रस्थापित होऊ शकेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. विषाणूच्या असमान सामाजिक व आर्थिक परिणामांवर उपाय म्हणून सर्वसमावेशक प्रतिसाद दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोविड-19 हा कोठेही धोकादायक आहे हे संपन्न राष्ट्रांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन आम्ही साथीच्या सुरुवातीच्या काळापासून करत आहोत. लस सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत आजाराचे नवीन प्रकार पुढे येतील. असमानतेचे चक्र सुरूच राहील. 2020 साली विकसित झालेल्या प्राणरक्षक विज्ञानामुळे 2021 मध्ये जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी जग एकत्र येते की नाही यावर सर्वकाही अवलंबून आहे.
नवीन साथीबद्दल आत्ताच विचार करणे आवश्यक आहे. नवीन साथ रोखण्यासाठी आपल्याला दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागणार असले, तरी कोविड-19 साथीमुळे जगाला मोठा फटका बसला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.