मुंबई -कॉंग्रेसच्या अस्वस्थतेमुळे राज्यातील सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र, तीन पक्षांचे सरकार असल्याने थोडेफार कुरकुरणे होणारच. अर्थात, सरकारला धोका होईल या भ्रमात कुणी राहू नये, असे म्हणत शिवसेनेने सरकारच्या स्थैर्याबाबत चिंतेची स्थिती नसल्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील सरकार चालवताना विश्वासात घेतले जात नसल्याची कॉंग्रेसची भावना बनली आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांतून तसे सूचित झाले. त्यावर सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसची तुलना कुरकुरणाऱ्या जुन्या खाटेशी करण्यात आली आहे. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या मित्रपक्षांच्या नेत्यांचे आणि विशेषत: त्यांच्या अनुभवाचे कौतुक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यासंदर्भात काही सूचना करतात. कॉंग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे. पण, जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी असली तरी तिला ऐतिहासिक वारसा आहे. आघाडी सरकारमध्ये अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी ठेवली पाहिजे, अशी समजुतदारपणाची भूमिका अग्रलेखात अधोरेखित करण्यात आली आहे.
त्याचवेळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला अप्रत्यक्षपणे शाब्दिक चिमटाही काढण्यात आला आहे. राज्यातील सरकारला धोका होईल आणि राजभवनाचे दरवाजे पहाटे पुन्हा उघडले जातील या भ्रमात कुणी राहू नये, असे अग्रलेखात म्हटले आहे.