कोलकात – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 124 वी जयंती होती. त्याची संधी साधत आज भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी एकमेकांवर जोरदार आगपाखड करीत एकमेकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदींच्या आजच्या पश्चिम बंगाल भेटीच्या पार्श्वभूमीवर ममतांनी त्यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की मोदी सरकारकडे नवीन संसद भवन बांधायला पैसे आहेत, स्वतःसाठी दोन महागडी विमाने घेण्यासाठी पैसा आहे पण आजवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक बांधण्यास मात्र त्यांनी कोणतेच लक्ष दिलेले नाही.
नेताजींच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली नाही, अशी टीका त्यांनी केली. आज सकाळी ममतांच्या नेतृत्वाखाली सहा किमीची पदयात्रा काढून नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. या लॉंगमार्चच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
त्या म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या हितासाठी नियोजन आयोग स्थापन केला होता पण मोदींनी तो बंद करून त्याऐवजी त्यांनी निती आयोग स्थापन केला. नेताजींचा जन्म दिन हा देशनायक दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी आपण केली पण त्यांनी त्याला पराक्रम दिवस असे नाव देऊन त्याला भलतेच स्वरूप दिले.
पराक्रम दिवसाचा नेमका अर्थ काय, अशी विचारणाही त्यांनी मोदींना केली. हे नाव ठरवण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी चर्चा केली होती काय, निदान पक्षी नेताजींचे वंशज सौगाता बसू यांच्याशी तरी तुम्ही चर्चा केलीत काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नेताजींना रवींद्रनाथ टागोर यांनी देशनायक अशी उपमा दिली होती.
त्याचे स्मरण करण्यासाठी आजचा दिवस हा देशनायक दिवस म्हणून साजरा केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये फक्त निवडणुकीच्या वेळी उडत उडत येतात आणि निवडणूक संपली की ते उडत उडत जातात, असा आरोपही त्यांनी केला.