अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन
पिंपरी – केंद्रात सरकार असल्याने देशामध्ये गरीबांची कामे वेगाने होत आहेत. ज्याला घर नव्हते त्याला घर मिळाले. गरीबाला गॅस मिळाला. दहा लाख शौचालयाचे बांधकाम केले, त्याला देशातील महिलांनी इज्जत घर असे नाव दिले. 20 कोटी लोकांपेक्षा जास्त नागरिकांना मुद्रा योजनेमध्ये फायदा दिला. तेवढ्याच नागिरकांचा अपघात विमा काढला. हे यापूर्वी कधी झाले नाही आता देश बदलतोय, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे 55 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनाला महापौर माई ढोरे अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सारंग जोशी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, क्रातीवीर चापेकर स्मारक समितीचे संस्थापक गिरीष प्रभुणे, अभाविपच्या पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्षा शिल्पा जोशी, स्वागत समिती अध्यक्ष सुधीर मेहता, सचिव ऍड. मोरेश्वर शेडगे, महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या इतिहासाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसारमाध्यमांनी जबाबदारी सांभाळून वागावे
कृषी कायद्यावर बोलत असताना जावडेकर यांनी प्रसार माध्यमांनाही सल्ला दिला. ते म्हणाले, कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये एक शेतकरी अपघातामध्ये मृत पावला. मात्र व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की त्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे. प्रसार माध्यमांनी याचा विचार न करता सरकारच्या विरोधात बातम्या चालविल्या. सर्व गोष्टींची शहानिशा करूनच बातम्या दिल्या पाहिजेत.