पुणे – सातत्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून, व्यवस्थापनाला तक्रारींला जागा न देता, प्रामाणिकपणे आणि निरलसपणे आपली सेवा बजावणाऱ्या संजय जुन्नरकर यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने समोर ठेवला पाहिजे. कामातील तत्परता आणि रंगांची समज उत्तम असलेल्या जुन्नरकर यांच्यासारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे “प्रभात’ची वाटचाल सुकर झाली आहे,’ अशा शब्दांत मुख्य उपसंपादक अविनाश गोडबोले यांनी संजय जुन्नरकर यांचा गौरव केला.
प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनीही यावेळी जुन्नरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले जुन्नरकर यांच्या वडिलांनीही वर्ष 1942 पासून गांधी खादी भांडारमध्ये 65 वर्षे आपली सेवा रुजू केली. अल्प वयात आईचे छत्र हरपल्यानंतर जुन्नरकर यांनी आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. समाधानी आणि शांत स्वभाव हे त्यांच्या चिरतरुणपणाचे रहस्य होते.
दै. प्रभातमधील पेजिनेशन आणि डीटीपी ऑपरेटरपदावर कार्यरत असलेले संजय जुन्नरकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त बुधवार दि. 13 रोजी निरोप देण्यात आला. आपल्या 37 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या जुन्नरकर यांच्याविषयी कार्यकारी संपादक अविनाश भट, लेखाधिकारी सीए रवीकुमार इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, डीटीपी विभागप्रमुख दीपक पवार, उपसंपादक मीलन म्हेत्रे आणि वरिष्ठ बातमीदार समीर कोडीलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मार्केटिंग प्रतिनिधी संदीप आकूत यांनी सूत्रसंचालन केले. उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांनी आभार मानले.