नागपूरमधील अधिवेशनाबाबत अधिकारी अनभिज्ञ
मुंबई : नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची परंपरा आहे. पण सद्याची महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती पाहता यंदा नागपूरमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांचे अधिवेशन मुंबईत होईल. त्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घ्यायचे झाल्यास तयारीसाठी लागणारा वेळ पाहता एवढ्या कमी कालावधीत अधिवेशनाची तयारी कशी होणार याची चिंता अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होईल, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
राष्ट्रपती राजवटीनंतर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या सत्ता स्थापनेला वेग आला असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सरकार स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांचे अधिवेशन घेतले जाईल. मात्र, त्यानंतर परंपरेनुसार नागपूरला अधिवेशन घ्यायचे झाल्यास तयारीसाठी कमी वेळ मिळणार आहे.
दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन होते. यासाठी सुमारे महिनाभर आधी तयारी सुरु होते. अधिवेशनाच्या एक आठवडा आधी मुंबईहुन संपूर्ण मंत्रालय कर्मचारी आणि सरकारी अधिकारी नागपुरात पोहचतात. मुंबईतून नागपुरला मंत्रालयातुन विविध विभागांच्या फायली ट्रक भरुन नागपुरला पोहचतात. अशावेळी उपराजधानी नागपुर म्हणजे मिनी मंत्रालयच होते. परंतु, यंदा नागपूरला अधिवेशन होणार किंवा नाही, याबाबत मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग अनभिज्ञ आहेत. मात्र, महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती पाहता यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गेल्यावर्षी नागपूरमध्ये झाले हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन
55 वर्षानंतर 2018 मधे राज्याच्या तत्कालीन फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबईत घेतले होते. त्यानंतर विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात नागपुरमध्ये घेतले होते. 1963 नंतर पहिल्यांदाच मुंबईत घेतले गेले होते. 1963 मध्ये 9 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यत मुंबईत हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यामुळे आता येणारे नविन सरकार यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुर किंवा मुंबईत घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.