महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
पुणे कॅन्टोंन्मेंट -निवडणूक प्रचारात प्रत्येक तास, मिनिटाचे नियोजन महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने या कार्यालयाचा वापर प्रचारातील सूत्रबद्धता, नियोजन आणि निरोपांच्या योग्य देवाण-घेवाणीसाठी करावा. त्यातून विजयाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडावेत, अशी अपेक्षा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली. भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार दिलीप कांबळे, गणेश बीडकर, उज्ज्वल केसकर, आरपीआयचे महेंद्र कांबळे आणि सुनील कांबळे उपस्थित होते.
बापट म्हणाले की, “उमेदवाराच्या प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन व्हायला हवे. प्रचार ज्या भागात, सोसायटीत आहे तिथले नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने करायला हवे. विजय आपलाच असला तरी जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने जीवाचे रान केले पाहिजे, अशी सूचनाही बापट यांनी केली. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मजबूत संघटन निर्माण केले असून संघटन शक्तीच कांबळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब असेही ते म्हणाले.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित, संतोष इंदुलकर, आरपीआय (ए) च्या संगीता आठवले, नगरसेविका किरण मंत्री, उमेश गायकवाड, कालिंदी पुंडे, प्रियांका श्रीगिरी, धनराज घोगरे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शिस्त हाच पक्षसंघटनेचा पाया : कांबळे
भारतीय जनता पक्षाची शिस्त हाच पक्ष संघटनेचा पाया आहे, अशी भावना भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी व्यक्त केली. विजयादशमी संचलनात सहभागी झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. कांबळे म्हणाले की, भाजप हा पहिल्यापासून शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून दाखल होत असल्यापासून लोकांना पक्षशिस्तीची सवय लावली जाते. पक्षाच्या संघटनेची रचना, कार्यपद्धती यामध्येही या शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. असे असले तरीही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यालाही मत मांडण्याचा अधिकार पक्षात आहे, असेही ते म्हणाले. शहराच्या अनेक भागांत शेकडो कार्यकर्ते शिस्तबद्ध संचलनात सहभागी होतात. स्थानिक नागरिक त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. असे लाखो शिस्तबद्ध कार्यकर्ते हेच पक्षाच्या संघटनेचा पाया आहेत. त्यांच्या ताकदीवरच पक्षाने ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये नेत्रदीपक विजय मिळवला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठीही अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार आहे. त्यांच्या साथीने, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक नक्की जिंकू, असा विश्वासही कांबळे यांनी व्यक्त केला.