चंद्रपूर : राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने हाच प्रयत्न केला होता त्यावेळी भाजपने याला कडाडून विरोध केला. भाजपसाठी तेव्हा वाईट असेलली ‘वाईन’ आता ‘फाईन’ झाली आहे. भाजप केवळ विरोधासाठी विरोध करतो, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारला तीन महिन्यांचा कालवधी झाला. या काळात मंत्री दिसत आहे, मात्र सरकार नावाची यंत्रणा दिसत नाही. फक्त विकासकामांना स्थगित देण्याचे काम सुरु आहे. हे स्थगिती सरकार आहे. सभागृहात बहुमताने मंजुर कामांना नवे सरकार स्थगिती देऊ शकत नाही. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. स्थगितीमुळे स्थगितीमुळे विकास निधी परत जाईल आणि जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल. राज्यात २४ तासात सरासरी सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत.”
शेतकऱ्यांच्या दुःखावर उत्सव करणारे हे राजकर्ते आहेत. ‘लम्पी’ने जिल्ह्यात हातपाय पसरले आहे. राज्य सरकार यावर गंभीर नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पक्षाचा खासदार वाढवण्याची चिंता आहे.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले, याकडे त्यांचे लक्ष नाही. मुख्यमंत्री शिंदे पहाटे पाच वाजपेर्यंत फक्त चाळीस आमदारांसाठी काम करतात. महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले असते तर जनता खुश असती, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.