मुंबई : राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाईन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, थेट आरोप विरोधकांवर केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी,”वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असेही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला एक परंपरा आहे. महाराष्ट्रानं काय बनावं यासाठी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते समर्थ आहेत. त्यांना सरकार चालवायचा चांगला अनुभव आहे. उगाच विरोधकांनी लेबल लावू नये, असे राऊत म्हणाले.
विरोधकांवर टीका करत राऊत म्हणाले की, तुम्ही अशी लेबलं लावू नका. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असे देखील राऊत म्हणाले.