ऍण्टिग्वा – वेस्टइंडिज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसऱ्या पंचांनी बाद दिले. सामना वेस्ट इंडिजने 8 गडी राखून जिंकला व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, जास्त चर्चा धनुष्काच्या बाद होण्याची सुरू झाली आहे.
श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना 21 व्या षटकात वेस्टइंडिजचा कर्णधार कॅरन पोलार्डने टाकलेल्या एका चेंडूवर धनुष्का गुणतिलका याने बचावात्मक फटका खेळला, त्यामुळे चेंडू त्याच्या पायाजवळून पोलार्डच्या दिशेने जात होता.
चेंडू गुणतिलकाच्या पायाला लागून पोलार्डच्याच दिशेने जात असतानाच धनुष्काने चेंडू पोलार्डकडे जाऊ नये यासाठी मुद्दाम इतरत्र लाथाडला असे वाटल्यामुळे त्याने मैदानावरील पंचांकडे अपील केले. पंचांनीही धनुष्काला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद दिले. मात्र, तरीही तिसऱ्या पंचांची मदत घेतली.
रिप्ले बघून तिसऱ्या पंचांनी क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुणतिलकाला बाद दिले. सोशल मीडियावर मात्र, धनुष्का नाबाद आहे व वेस्ट इंडिजने खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती, अशी मते व्यक्त केली.