मुंबई – करोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणणारे “मावळा’ हे संयंत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, करोनाच्या लढाईत मुंबई महापालिकेने जगाने दखल घ्यावी असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असेच पुढे राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक “मावळ्यांची’ कामगिरी महत्त्वाची ठरेल.
मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण आहे. 2012 पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना मांडली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती.